मुंबई : परिस्थितीमुळे बेघर असलेल्या नागरिकांनी मुंबईची टिपलेली छायाचित्रे अचंबित करणारी आहेत. तसेच, समाजात दुर्लक्षित बेघरांच्या नजरेतून मुंबईचे खऱ्या अर्थाने दर्शन घडते, असे गौरवोद्गार महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी बुधवारी काढले. ‘माय मुंबई प्रोजेक्ट फोटो’ प्रदर्शनाच्या उद्घाटनादरम्यान संबंधितांनी टिपलेल्या छायाचित्रांना दाद देताना ते बोलत होते.

मुंबईतील छायाचित्रे टिपण्यासाठी ‘पहचान’ या संस्थेने मुंबईतील ५० बेघर नागरिकांची निवड केली होती. तसेच, त्यांना कॅमेरे देऊन त्यांच्या दृष्टिकोनातून मुंबईची छायाचित्रे टिपण्याची संधी दिली होती. याबाबत त्यांना मार्गदर्शनही करण्यात आले होते. निवड झालेल्या ५० जणांनी मिळून १ हजार १०७ छायाचित्रे टिपली. त्या छायाचित्रांपैकी निवडक ४० छायाचित्रांचे प्रदर्शन महानगरपालिका मुख्यालयासमोरील मुंबई प्रेस क्लब येथे भरविण्यात आले आहे. या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन भूषण गगराणी यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बेघर नागरिकांच्या जीवनातील अनुभव आणि त्यांच्या दृष्टिकोनातून मुंबईचे विविध पैलू या छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून समोर आले आहेत. ही संकल्पना खरोखर अभिनव असून त्यामुळे मुंबई शहराच्या सामाजिक वास्तवाचे दर्शन घडले, असे गगराणी यांनी सांगितले. समाजाकडून दुर्लक्षित घटकांची कला समाजासमोर आणून, त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी ‘पहचान’ संस्थेने राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. मुंबईतील बेघर नागरिकांना निवारा मिळावा, त्यांना मूलभूत नागरी सुविधा मिळाव्यात म्हणून महानगरपालिका प्रयत्नशील आहे, असे त्यांनी नमूद केले.त्यावेळी बेघर निवारा राज्य संनियंत्रण समितीचे अध्यक्ष उज्ज्वल उके, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली, ज्येष्ठ छायाचित्रकार प्रशांत नाकवे, ‘पहचान’ संस्थेचे ब्रिजेश आर्य, सार्थक बॅनर्जीपुरी, सुभाष रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते.