पाण्याची टंचाई आणि रोजगारा अभावी गाव सोडून मुंबई आणि पुण्यात येणाऱ्या दुष्काळग्रस्तांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय करण्याचा निर्णय 'नाम फाउंडेशन'ने घेतला आहे. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या 'नाम फाउंडेशन'ने आतापर्यंत दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदत करण्याबरोबरच जलसंधारणाची कामे हाती घेतली आहेत. त्यानंतर आता गावातील बिकट परिस्थितीमुळे शहरात येणाऱ्या दुष्काळग्रस्तांच्या पोटापाण्याची व्यवस्था करण्याचा उपक्रम नामने हाती घेतल्याची माहिती नाना पाटेकर यांनी सांगितले. गावातून येणारे हे लोक मुंबईत जागा मिळेल तिथे वास्तव्य करतात. अशावेळी त्यांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे त्यांना निदान एकवेळचे जेवण तरी मिळावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे नाना पाटेकर यांनी सांगितले. या लोकांना राहण्यासाठी पालिकेने मैदाने उपलब्ध करून द्यावीत, अशी विनंतीही नाना पाटेकर यांनी केली. त्यासाठी ‘नाम’ फाऊंडेशन मुंबई-पुण्यातील महापालिका प्रशासनांशी संपर्क साधण्याच्या तयारीत आहे.