मोदी आडनावाबद्दलच्या मानहानी प्रकरणात काल सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आज राहुल गांधी यांचं संसद सदस्यत्व रद्द करण्यात आलं असून त्यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आलं आहे. दरम्यान, यावरून विविध राजकीय प्रतिक्रिया येत असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर टीकास्र सोडलं आहे. ते विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा – मोठी बातमी! सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधींची खासदारकी रद्द

काय म्हणाले नाना पटोले?

आज राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय नरेंद्र मोदी सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. हा निर्णय लोकशाही विरोधी आहे. गेल्या ९ वर्षात पंतप्रधान मोदी यांच्या मित्रांनी लाखो-हजारो कोटी रुपये देशातून पळवले आहे. मात्र, त्याच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या राहुल गांधींचं लोकसभेचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. याचा आम्ही निषेध करतो आणि मोदी सरकारचा धिक्कार करतो, अशी संतप्त प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

हेही वाचा – राहुल गांधींची खासदारकी रद्द, पृथ्वीराज चव्हाणांचं मोदी सरकारवर टीकास्र; म्हणाले, “हे पूर्णपणे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकं काय प्रकरण?

राहुल गांधी यांनी १३ एप्रिल २०१९ रोजी कर्नाटकातील कोलार येथे निवडणूक रॅलीत वादग्रस्त वक्तव्य केले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते, “नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचे आडनाव एकसारखेच का आहे? सगळ्या चोरांची आडनावं मोदी का असतात?” या विधानाबाबत भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल यांच्यावर सुरत सत्र न्यायालयात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता. सर्व चोरांचे मोदी हे आडनाव आहे, असे म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संपूर्ण मोदी आडनावाची बदनामी केल्याचा आरोप भाजप आमदाराने आपल्या तक्रारीत केला होता. दरम्यान, याप्रकरणी काल राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोषी ठरवत दोन वर्षांच्या शिक्षा सुनावली होती.