उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी नाही तर पदासाठी तडजोड केली आहे, त्यामुळे शिवसेनेच्या एखाद्या नेत्याला शरद पवार त्यांचे नेते नाहीत, असं वाटण्यात काहीच चुकीचं नाही. आज जी अनंत गितेंची गत आहे, तीच शिवसेनेची गत आहे. पक्षात शिवसैनिकांना आणि आमदारांना कोणीच विचारत किंबहुना मंत्र्यांनाही कोणी काही विचारत नाहीत. त्यामुळे शिवसैनिकांची खदखद वाढली आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. नारायण राणे झी २४ तासशी बोलत होते. दोन दिवसांपूर्वी अनंत गीते यांनी शरद पवार हे आमचे नेते नाहीत, तर बाळासाहेब ठाकरे आहेत, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. तर, संजय राऊत यांनी गीते यांची भूमिका ही पक्षाची नसून वैयक्तिक असल्याचं म्हटलं होतं. यावरूनच राणे यांनी शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ठाकरेंनी केवळ मुख्यमंत्री पदासाठी तडजोड केली हिंदुत्वासाठी नाही. हे पक्षातील नेत्यांना, आमदारांना आणि शिवसैनिकांना देखील माहित आहे. पण त्यांना कोण विचारतंय. असा सवाल करत गीते यांच्या वक्तव्याशी सहमत असल्याचं नारायण राणे म्हणाले. दरम्यान, गीते यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, यावर बोलताना राणे म्हणाले, की ते दुसरं काय करू शकतात. गीते यांना कदाचित फासावर लटकवतील. तर, गीते यांच्यावर कारवाई करायची की नाही, हे पक्षप्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असं संजय राऊत म्हणाले होते.