मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर बैठका घेण्याचे आदेश दिले आहेत. महिन्याच्या पहिल्या शनिवारी तालुकास्तरावर, दुसऱ्या शनिवारी जिल्हास्तरावर आणि तिसऱ्या शनिवारी राज्यस्तरावर बैठक घेण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी मुंबईतील प्रदेश कार्यालयात कार्यकारिणीची आढावा बैठक पार पडली. या वेळी राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्यासह आजी-माजी आमदार, खासदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. मुंबईतील बैठकीत कार्यकर्त्यांचे प्रश्न, अडचणी सोडविण्यावर भर देण्यात येईल, असेही जाहीर करण्यात आले.
महाराष्ट्रात धर्मिक द्वेष वाढविण्याचे काम : आव्हाड
महाराष्ट्रात सत्ताधारी धार्मिक द्वेष पसरविण्याचे काम करीत आहेत. राज्यात गुन्हे वाढले आहेत. लाडक्या बहिणी सावत्र झाल्या आहेत. त्यांचा वापर करून, त्यांना अडगळीत टाकण्यात आले आहे, अशी टीका राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी केली.
बोधगया येथील मंदिराबाबत बौद्ध समाजाच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. महात्मा फुले यांच्यावरील चित्रपटाला आमचा पाठिंबा आहे. जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात आम्ही भूमिका घेणार आहोत. नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारा हा कायदा आहे. त्यामुळे आमचा विरोध कायम राहील. बाराव्या, तेराव्या शतकातील मशिदींचा सात बारा कुठून आणणार आहात, सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न योग्य आहे, असेही आव्हाड या वेळी म्हणाले.
महागाईविरोधात आंदोलन
कच्च्या तेलाचे दर कमी असतानाही राज्यात इंधनाचे दर अधिक आहेत. हा सरकारचा सर्व सामान्यांच्या खिशावर डल्ला आहे, असा आरोप करीत महागाई वाढवणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.