मुंबई : पारंपरिक अभ्यासक्रमातून पदवी शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात नोकरी मिळवण्यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांचे स्वरुप बदलण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) घेतल्याची माहिती माजी अध्यक्ष जगदीश कुमार यांनी मुंबईमध्ये दिली. यूजीसीतर्फे पश्चिम विभागातील ४५० मोठ्या संस्थांसाठी मुंबई विद्यापीठात एका दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी वरील माहिती दिली.
वेगाने बदलत्या तंत्रज्ञानामुळे भविष्यात सुमारे आठ कोटी नोकऱ्यांवर कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. पण त्याचवेळी तंत्रज्ञानाशी निगडीत साडेतास कोटी नवीन नोकऱ्या तयार होणार आहेत. तरीही देशभरातील उच्च शिक्षण घेणाऱ्या साडेचार कोटी विद्यार्थ्यांपैकी ७० टक्के विद्यार्थी पारंपरिक कला, वाणिज्य आणि विज्ञान या पदवी अभ्यासक्रमांची निवड करीत आहेत. हे अभ्यासक्रम भविष्यात नोकरी मिळवून देण्यासाठी पुरेसे नाहीत. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांचे वाढते महत्त्व, उद्योगांकडून विशिष्ट अभ्यासक्रमांची होणारी मागणी आणि रोजगारक्षमता याचा विचार करून विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांचा चेहरामोहरा बदलण्याचे ठरवले आहे. त्यानुसार यूजीसीने ‘एकात्मिक कौशल्य अभ्यासक्रम’ तयार करण्याचे ठरवले आहे. यामध्ये ५० टक्के शिक्षण हे संबंधित विषयाचे असेल. तर उरलेले ५० टक्के म्हणजेच तब्बल ८० श्रेयांक मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध कौशल्यवृद्धीचे अभ्यासक्रम पूर्ण करावे लागतील. याबाबत यूजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात येणार असल्याचे जगदीश कुमार यांनी सांगितले.
‘एकात्मिक कौशल्य पदवी अभ्यासक्रम’ कसा असेल
एखाद्या विद्यार्थ्याने कला शाखेतून पदवीचे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतल्यास त्याला पहिल्या दोन वर्षांत कला शाखेतील निवडलेल्या विशिष्ट विषयासाठी १६० श्रेयांकांपैकी ५० टक्के म्हणजे ८० श्रेयांक मिळतील. उर्वरित दोन वर्षांमध्ये हा विद्यार्थ्याला विविध कौशल्य शिक्षण देणारे छोटे अभ्यासक्रम पूर्ण करून ८० श्रेयांक जमा करेल. त्यामुळे पदवी शिक्षण पूर्ण होतानाच त्याच्याकडे असलेल्या कौशल्य ज्ञानामुळे त्याला रोजगार मिळण्याची शक्यता वाढणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासोबत प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्याच्या सूचना विद्यापीठांना दिल्या आहेत. यामध्ये पदवी अभ्यासक्रमातील पहिली दोन वर्षे विद्यार्थी वर्गात शिक्षण घेईल. त्यानंतर पुढील दोन वर्षे प्रत्यक्ष उद्योगांमध्ये काम करून प्रशिक्षण घेईल. मुंबई विद्यापीठाने अशा प्रकारचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत.
उद्योग संस्था ठरवणार अभ्यासक्रम
शिक्षण अधिकाधिक रोजगाराभिमुख बनवण्याच्या दृष्टीकोनातून अभ्यासक्रम तयार करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यानुसार एखाद्या उद्योगाला आवश्यक असलेल्या मनुष्यबळानुसार संबंधित उद्योग संस्था विद्यापीठासोबत चर्चा करून विशिष्ट अभ्यासक्रम तयार करू शकते. हे अभ्यासक्रम दोन वर्षे शिक्षण आणि दोन वर्षे प्रत्यक्ष कार्यानुभव, या तत्त्वावर चालविण्यात येणार असल्याचे जगदीश कुमार यांनी स्पष्ट केले.