भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा निर्णय राष्ट्रवादीच्या नेत्यांना फारसा रुचलेला नाही. जनतेने दिलेला कौल मान्य करून विरोधात बसून पुढील पाच वर्षांंत पक्ष वाढवू या, असे स्पष्ट मत पक्षाच्या नेत्यांनी अलिबागमध्ये सुरू असलेल्या शिबीरात मंगळवारी मांडले.
सुनील तटकरे, जयंत पाटील, भास्कर जाधव, सुप्रिया सुळे, जयदत्त क्षीरसागर आदी नेत्यांनी पहिल्या दिवशी विश्लेषण केले. पराभवापेक्षा भाजप सरकारला बाहेरून दिलेल्या पाठिंब्याची राष्ट्रवादीत जास्त प्रतिक्रिया उमटली आहे. याला माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी वाट करून दिली. जनतेने आपल्याला नाकारले आहे. अशा वेळी विरोधी बाकांवर बसून जनतेचे प्रश्न मांडावेत आणि पक्ष वाढीसाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे परखड मत त्यांनी मांडले.
पराभव आपल्या हातानेच झाल्याची भावना काही नेत्यांनी व्यक्त केली. जनतेबरोबर जाण्यात आपण कमी पडलो, असे मत माजी मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. ग्रामीण भागात राष्ट्रवादीची पाळेमुळे भक्कम आहेत, पण शहरी भागात कमी पडत आहोत. मध्यमवर्गाने राष्ट्रवादीला स्वीकारलेले नाही. गेल्या १५ वर्षांंत सत्तेत असताना राष्ट्रवादीने केलेल्या विविध कामांमुळे समाजाचा स्तर उंचावत गेला. नेमके मध्यमवर्गीयांची मने जिंकण्यात आपण कमी पडलो. पुढील रणनिती ठरविताना शहरी मध्यमवर्ग डोळ्यासमोर ठेवावा लागेल, असे मतही पाटील यांनी व्यक्त केले.