मुंबईतील धोकादायक इमारतींची दुरुस्ती पूर्ण होईपर्यंतच्या काळातील तात्पुरता निवारा म्हणून संक्रमण शिबिरांत स्थलांतरित झालेल्या शेकडो कुटुंबांची दुसरी पिढीदेखील तेथेच जन्माला येते आणि वाढते. मूळ घराच्या छपराखाली परतण्याचे स्वप्न गोंजारत अनेकजण काळाच्या पडद्याआड जातात. कोंबडय़ांची खुराडी बरी, छळछावण्या परवडल्या, अशा अवस्थेतील या संक्रमण शिबिरांमध्ये राहण्याची पाळी या दुर्दैवी कुटुंबांवर आली आहे. गलिच्छपणाचे साम्राज्य, पाणी, वीज या मूलभूत गरजांचा दुष्काळ आणि असंख्य गैरसोयींना सामोरे जात संक्रमण शिबिरांत आयुष्य ढकलणाऱ्या कुटुंबांचा आवाज सरकापर्यंत पोहोचतच नाही. वर्षांनुवर्षांच्या समस्यांचे ओझे वाहणाऱ्या या कुटुंबांची लढण्याची शक्तीदेखील आता क्षीण झाली आहे. मतपेढीचे मोल नसलेल्या या रहिवाशांना न्याय देण्यासाठी राजकीय नेत्यांनाही वेळ नाही. जुना मुंबईकर आणि बहुतांश मराठी भाषिक असणाऱ्या या कुटुंबांची आगीतून उठून फुफाटय़ात पडल्यासारखी अवस्था झाली आहे.
समस्यांचेही संक्रमण
मुंबई शहरातील धोकायदायक इमारतींमधील हजारो कुटुंबांना कुलाब्यापासून मुलुंड-बोरिवलीपर्यंतच्या संक्रमण शिबिरांमध्ये हलविण्यात आले आहे. येथील चाळीतील घरे दहा बाय दहाची आणि इमारतींमधील घरे थोडी मोठी, म्हणजे १६० चौरस फुटांची आहेत. सात मजली इमारती, पण पुरेशी लिफ्टची व्यवस्था नाही, पिण्याच्या पाण्याची समस्या रोजचीच आहे. काही वसाहतींमध्ये तर फक्त ७ मिनिटे नळाला पाणी येते, अशा तक्रारी आहेत. मोडकळीस आलेल्या इमारतींमधून सुरक्षित जागा म्हणून संक्रमण शिबिरांत हलविण्यात आले, पण संक्रमण शिबिरांच्या चाळी आणि इमारतीच आता मोडकळीस आल्या असून त्यांच्या दुरुस्तीकडे म्हाडा व मुंबई इमारत दुरुस्ती मंडळाचे पूर्ण दुर्लक्षच असल्याने, ‘संकटाकडून संकटाकडे’ असा या कुटुंबांचा प्रवास सुरू आहे.
३० वर्षांनंतरही ‘तात्पुरत्या’ निवाऱ्यातच
धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना त्यांच्या मूळ इमारतीची दुरुस्ती व पुनर्बाधणी होईपर्यंत संक्रमण शिबिरात स्थालंतरित केले जाते. परंतु २५-३० वर्षे झाली तरी अनेक कुटुंबांना आपली मूळ घरे मिळालेली नाहीत. काही कुटुंबांत नातवांची लग्ने झाली तरी त्यांचे मूळचे घर मिळेल का, याबद्दल कुणी त्यांना काही ठामपणे सांगू शकत नाही. काही ठिकाणी मूळ जागेवर इमारती उभ्या राहिल्या, त्यातील घरे विकली, पण मूळ मालक असलेली कुटुंबे अजून संक्रण शिबिरातच खितपत पडली आहेत. अनेक कुटुंबांची बिल्डरांनीच फसवणूक केली आहे. म्हाडा मात्र त्यांची साधी दखलही घ्यायला तयार नाही. प्रतीक्षा नगरसारख्या मुंबईतील सर्वात मोठय़ा संक्रमण शिबिराच्या जागेवर म्हाडाने मोठी वसाहत उभी केली. बाहेरच्या लोकांना ती घरे विकण्यात आली. संक्रमण शिबिरातील रहिवाशांच्या अस्थिर जीवनात काहीही फरक पडला नाही. मुंबईतील ३८ संक्रमण शिबिर वसाहतींमधील रहिवाशांची यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही.