मुंबई : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील वाशिम येथे रविवारी २० हून अधिक वाहने टायर पंक्चर झाल्याने बंद पडली. काही समाजकंटक समृद्धी महामार्गावर खिळे टाकून वाहने पंक्चर करीत असल्याचा आरोप यानिमित्ताने होत होता. मात्र, हा आरोप महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) फेटाळून लावला आहे. समृद्धी महामार्गावर कोणीही खिळे टाकलेले नाही. समृद्धी महामार्गावर वाशिम येथे रविवारी रात्री एक अतिशय वजनदार पत्रा पडला होता. या लोखंडी पत्र्यावरून वाहने गेल्यामुळे टायर पंक्चर झाल्याचे उघडकीस आले आहे.

समृद्धी महामार्गामुळे नागपूर-इगतपुरी प्रवास अतिवेगवान झाला आहे. मात्र, त्याच वेळी वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाशिम येथे समृद्धी महामार्गावर रविवारी रात्री वाहने बंद पडण्यास सुरुवात झाली. काही मिनिटांतच २० हून अधिक वाहनांचे टायर पंक्चर झाल्याचे निदर्शनास आले. ही सर्व वाहने महामार्गाच्या एका बाजूला लावण्यात आली. यासंबंधीची माहिती मिळताच संंबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाशिममधील पॅकेज ५ मधील साखळी क्रमांक २२२/५२० येथे ही घटना घडली. येथून जाणाऱ्या एका ट्रकमधील वजनदार लोखंडी पत्रा येथे पडला होता. त्यावरून गेलेली वाहने पंक्चर झाल्याचे निष्षन्न झाले. दरम्यान, अधिकाऱ्यांनी तत्काळ रस्तारोधक उभारून घटनास्थळाचा भाग वाहतुकीसाठी बंद केला. त्यानंतर मालेगाव पथकर नाक्यावरून क्रेन मागवून पत्रा हटविण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीकडून देण्यात आली. टायर पंक्चर झालेल्या वाहनांचे वाहनचालक आणि प्रवाशांसाठी खाण्यापिण्याची सोय करून त्यांना सुरक्षित ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूला बसविण्यात आले. तसेच, वाहनांची योग्य ती दुरुस्ती करून देण्यात आली.

हेही वाचा…मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पास गती देण्याचे आदेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समाजमाध्यमांवर चुकीची ध्वनीचित्रफित

या घटनेनंतर समाज माध्यमांवर एक ध्वनीचित्रफित फिरत आहे. ध्वनीचित्रफितीनुसार समृद्धीवर खिळे टाकून वाहने पंक्चर केली जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ही माहिती चुकीची असून समृद्धीवर कोणीही खिळे टाकत नसून पत्रा पडल्याने वाहनांचे टायर पंक्चर झाल्याचे एमएसआरडीसीने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. तर समृद्धी महामार्ग प्रवासासाठी सुरक्षित असून योग्य त्या नियमाचे पालन करून प्रवास करावा, असे आवाहन एमएसआरडीसीकडून करण्यात आले आहे.