मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारच्या कंपनीने पुण्यातील वतनाची ४० एकर जमीन भ्रष्ट मार्गाने बळकावल्याचे उघड झाले आहे. पार्थ पवार यांनी हजारो कोटी रुपयांची जमीन केवळ ३०० कोटी रुपयात म्हणजे कवडीमोल भावाने हडप केली असून मुद्रांक शुल्क फक्त ५०० रुपये दिले आहे. सरकारच्या ताब्यात असणाऱ्या या वतन जमिनीचा व्यवहार झालाच कसा, असा सवाल करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची हकालपट्टी करण्याचे धाडस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावे, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

सरकारच्या ताब्यात असलेली वतन जमीन विकत घेता येते का, मुद्रांक शुल्क माफ का केले? हा व्यवहार रद्द करावा व संपूर्ण व्यवहाराशी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून सर्वांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ‘सारखं मोफत कसं मागता, जरा हातपाय हलवा’ असा दम शेतकऱ्यांना देणाऱ्या अजित पवार यांच्या दिवट्याच्या जमीन व्यवहारात तब्बल २१ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे. मग शेतकऱ्यांचे कर्ज माफ करताना अजित पवारांना वेदना का होतात, हे म्हणजे ‘आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्टं’, असा प्रकार असून हा व्यवहार एक मोठा घोटाळा आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर खुलासा केला पाहिजे, असेही प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.