लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी महामार्गावर मागील काही दिवसांपासून दगडफेकीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन आता तेथील पोलीस सुरक्षा वाढविण्यात आली आहे. महामार्गावर पोलिसांची गस्त वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) महामार्ग सुरक्षा पोलिसांना गस्तीसाठी १५ वाहने खरेदी करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीची प्रक्रिया सुरू झाली असून आता लवकरच महामार्गावर १५ वाहने गस्त घालणार आहेत.

डिसेंबरमध्ये नागपूर ते शिर्डी असा ५२० किमीचा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. त्यामुळे नागपूर ते शिर्डी अंतर केवळ पाच तासात पार करता येत आहे. मात्र त्याचवेळी या महामार्गावर अपघातांची मालिका सुरु आहे. त्यात काहींना जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच आता आणखी एका चिंतेची भर पडली आहे. ती म्हणजे दगडफेकीच्या घटनांची. मागील काही दिवासांपासून संभाजीनगर ते वाशीमदरम्यान दगडफेकीच्या घटना घडत आहेत. त्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. त्याचवेळी प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. या प्रकाराची आता एमएसआरडीसीने गंभीर दखल घेतली आहे. सोमवारी एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय यादव यांनी प्रत्यक्षस्थळी जाऊन पाहणी केली. तसेच यावेळी एमएसआरडीसी, वाहतूक पोलीस, महामार्ग पोलीस यांच्यात एक बैठकही झाली.

आणखी वाचा- मुंबई: मानखुर्दमध्ये गतिमंद मुलीवर बलात्कार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्या बैठकीत अपघातांसह दगडफेकीच्या घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याच्यादृष्टीने अनेक निर्णय घेण्यात आल्याची माहिती यादव यांनी दिली. अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलीस आणि महामार्ग पोलिसांकडून वाहनांच्या वेगावर आणि महामार्गावरील वाहनांच्या शिस्तीवर लक्ष ठेवले जात आहे. प्रत्येक पथकर नाक्यावर समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे. तेथे वाहनचालकांचे, प्रवाशांचे समुपदेशन केले जात आहे. आता दगडफेकीच्या घटना रोखण्यासाठी महामार्गावरील पोलीस गस्त वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान गस्तीसाठी महामार्ग सुरक्षा पोलीसांकडे वाहने नसल्याने गस्त घालणे अवघड ठरत आहे. त्यामुळे महामार्ग सुरक्षा पोलिसांसाठी १५ चारचाकी वाहने खरेदी करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला असल्याचेही यादव यांनी सांगितले. या वाहनांच्या खरेदीची प्रकिया सुरु करण्यात आली आहे. वाहने येण्यासाठी काहीसा वेळ लागणार असल्याने सध्या काही वाहने भाडे तत्त्वावर घेऊन महामार्गावर गस्त सुरु करण्याचा निर्णय झाल्याचेही यादव यांनी सांगितले.