राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांनी बंड करत मोठी फूट पाडली. अनेक ज्येष्ठ नेत्यासह ४० हून अधिक आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दर्शवला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलिन करण्याबाबत समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा रंगली आहे. याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. याविषयी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते ‘लोकसत्ता लोकसंवाद’ या कार्यक्रमात बोलत होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “भ्रष्टाचाराबद्दल आक्रमकपणे बोलणे कर्नाटकमध्ये यशस्वी झाले, महाराष्ट्रातही असेच बोलले गेले पाहिजे. आमच्यातील मतभेद कमी करून, पदांचे वाटप करून प्रचार केला पाहिजे. परंतु अजून ते होताना दिसत नाही. गेल्या वर्षभरात शिवसेना आणि राष्ट्रवादीत झालेल्या बंडाळीमुळे प्रादेशिक पातळीवरील दोन पक्ष कमकुवत झाले. यापुढील काळात महाराष्ट्रात द्विपक्ष पद्धत अस्तित्वात येईल. तशी राजकीय वाटचाल सुरू झाली आहे. म्हणजेच काँग्रेस आणि भाजप अशीच लढत होईल.”
शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील?
“राष्ट्रवादीतील बंडानंतर शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील अशी समाजमाध्यमांमध्ये चर्चा असली तरी तशी शक्यता लगेचच तरी दिसत नाही. शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाच, तर त्यांना संसदीय मंडळात सामावून घेतले जाऊ शकते,” असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं.
“हे काही बरोबर नव्हते, आम्ही ते बंद करून टाकले”
“महाराष्ट्रात आम्ही वज्रमूठ सभा घेतल्या, त्याचा अनुभव मला तरी काही चांगला आला नाही. उद्धवजींची तब्येत बरी नाही, मग ते उशिरा येतील, सगळ्यांनी बाजूच्या पोडियमवर बोलायचे, उद्धवजी आले की त्यांच्यासाठी मध्ये पोडियम ठेवायचा. हे काही बरोबर नव्हते, आम्ही ते बंद करून टाकले. पण पुढे एकत्र सभा होतील, सभा कराव्या लागतील,” असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी मविआच्या कार्यपद्धतीवर भाष्य केलं.
व्हिडीओ पाहा :
“आमच्यात आपापसात मतभेद आहेत”
पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, “महाराष्ट्रात सध्या राजकीय आघाडीवर जे घडत आहे, त्याविरोधात काँग्रेसने आक्रमक व्हायला पाहिजे, परंतु आमच्यात आपापसात मतभेद आहेत. आधी ही गटबाजी संपुष्टात आणावी लागेल. राहुल गांधी यांनी तरुण नेतृत्व पुढे केले. वरिष्ठ लोकांना बाजूला केले. त्याचे अपेक्षित सकारात्मक परिणाम मिळाले नाहीत. कारण जुन्यांचा अनुभव व नव्यांचा उत्साह हे एकत्र करायला पाहिजे होते.”
“राहुल गांधींचा तरुणांकडे नेतृत्व देण्याचा निर्णय यशस्वी झाला नाही”
“पूर्वीच्या नेत्यांनी ते केले, परंतु आता राहुल गांधी यांनी फार आक्रमकपणे तरुणांकडे नेतृत्व दिले. ते यशस्वी झाले असे म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ भाजपमध्ये पूर्वी काम केलेल्या नवज्योत सिद्धू यांच्याकडे पंजाब काँग्रेसची सूत्रे सोपविली. कॅप्टन अमिरदरसिंग यांच्यासह सारेच जुने नेते एका बाजूला आणि सिद्धू स्वतंत्र असे चित्र निर्माण झाले. अपमान झाल्याने अमिरदरसिंग बाहेर पडले,” अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
हेही वाचा : द्विपक्षीय राजकारणाकडे..
“अजूनही त्या चुका होत आहेत”
“शेवटी निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. काँग्रेसला राज्य गमवावे लागले. केवळ आक्रमकता आहे, म्हणून त्यांची विचारधारा काय आहे हे न बघता पक्षाची सूत्रे दिली. पक्षातून त्याला एखादे मंत्रीपद दिले असते तर हरकत नव्हती. याआधी या चुका झाल्या आणि त्या अजूनही होत आहेत. बसपामधून आलेल्या नेत्याला अचानकच उत्तर प्रदेशात काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष केले गेले. बसपा व काँग्रेसमध्ये काय वैचारिक साम्य आहे?” असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला.