मुंबई : मध्य रेल्वेवरील मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या प्रशासनाने गर्दीच्या विभाजनासाठी उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. दिवा येथे उड्डाणपूल नसल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रकावर दररोज कोलमडते. परिणामी, उड्डाणपुलासाठी लागणारी दिवा (पश्चिम) येथील जागा संपादीत करण्याच्या प्रक्रियेला गती आली आहे. एकूणच पुढील एका वर्षात उड्डाणपूल पूर्ण होईल, असा आशावाद व्यक्त करण्यात.
दिवा पूर्व-पश्चिम रस्ते वाहतूक करताना दिव्यातील १० रेल्वे मार्गिका ओलांडाव्या लागतात. दिव्यातील समांतर रस्ता फाटक (लेव्हल क्रॉसिंग गेट) सातत्याने खुले करून शेकडो वाहनांची वाहतूक होते. फाटक खुले ठेवल्यावर मध्य रेल्वेवरील अप आणि डाऊन मार्गावरील धीम्या आणि जलद लोकल थांबवल्या जातात. फाटक अतिरिक्त वेळ खुले ठेवल्यास लोकल सेवा रखडून मध्य रेल्वेचा वक्तशीरपणा बिघडतो. त्यावर तोडगा काढण्यासाठी २०१३ मध्ये दिवा उड्डाणपुलाला मंजुरी देण्यात आली. मात्र, त्यानंतर ठाणे महापालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे उड्डाणपुलाचे काम रखडले. कामात दिरंगाई होत असल्याने रस्ते मार्गावरील आणि लोकलमधील प्रवाशांचा खोळंबा होतो.
मध्य रेल्वे प्रशासनाने त्यांच्या हद्दीतील उड्डाणपुलाची कामे पूर्ण केली. तसेच ठाणे महापालिकेने दिवा पूर्वेकडील बांधकामे पाडून तिथे रस्ता तयार केला. परंतु, दिवा पश्चिमेकडील भूसंपादन करण्यास अडचणी येत होत्या. गेल्या दोन वर्षांपासून भूसंपादनाचा प्रश्न सुटत नसल्याने उड्डाणपूल बांधण्यास विलंब होत आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ धावत्या लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर यंत्रणा खडबडून जागी झाली. दिवा पश्चिमेकडील भूसंपादनाला गती देण्यात आली आहे. नागरिकांना नोटीस पाठवून, त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्यात येत आहे. नागरिकांना जागेचा योग्य मोबादला देऊन भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर साधारण ९ ते १२ महिन्यांत उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईल, अशी माहिती ठाणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
दिवा येथील फाटक अतिरिक्त वेळ खुले राहिल्याने दररोज १० ते १५ लोकल विलंबाने धावतात. तर, एक ते दोन लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागतात. त्यामुळे दिवा उड्डाणपुलाचे काम करण्यासाठी ठाणे महापालिकेला वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
दिवा (पूर्व) येथील रस्त्यावरील बाजारामुळे वाहने उभी करण्यात अडचणी येत आहेत. तसेच दिवा फाटक बंद असताना, दिवा पूर्व-पश्चिमेकडे शेकडो वाहनांच्या रांगा लागतात.