उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बेताल वक्तव्याचे तीव्र पडसाद सोमवारी मुंबई महापालिकेतही उमटले. अजितदादांच्या सत्ताधाऱ्यांनी निषेध करणारे निवेदन केले. त्याला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक वर्षांपूर्वी घडलेले ‘रमेश किणी हत्या’ प्रकरण उकरून काढले. त्यानंतर झालेल्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करण्याची वेळ आली.
सभागृह नेते शैलेश फणसे यांनी पालिकेचे कामकाज सुरू होताच अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करणारे निवेदन केले. अजित पवार यांचे वक्तव्य अंत्यत बेताल आणि राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे, असा उल्लेख फणसे यांनी आपल्या भाषणात केला. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नगरसेवकांनी गदारोळ सुरू केला. विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम, प्रवीण छेडा आदी नगरसेवकांनी फणसे यांच्या भाषणात अडथळे आणण्यास सुरुवात केली. तर आघाडीच्या नगरसेवकांनी ‘अजित पवार झिंदाबाद’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. मुंबईत पाण्याचा प्रश्न गंभीर असताना राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचे राजकारण सत्ताधारी करत असल्याचे छेडा यांनी सांगितले.
अजित पवार यांनी माफी मागितली असून आता हा वाद मिटल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय पिसाळ यांनी सांगितले. त्याचप्रमाणे राज्यात याआधी ‘रमेश किणी हत्या’ प्रकरणासारखी गंभीर प्रकरणे घडली आहेत, असा शेरा मारत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मर्मावर बोट ठेवले.
या विधानाला मनसेचे दिलीप लांडे, संदीप देशपांडे, प्रकाश दरेकर यांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यावरून पुन्हा दोन्ही बाजूने घोषणाबाजी सुरू झाली आणि महापौर सुनील प्रभू यांनी दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर महापौरांनी आवाहन करूनही गोंधळ सुरूच राहिल्याने अखेर महापौरांनी कामकाज स्थगित करण्याचा निर्णय घेतला.