मुंबई : शिवडी – वरळी उन्नत रस्त्यावरील प्रभादेवी पुलाच्या कामातील प्रकल्पबाधित दोन इमारतींसह एकूण १९ इमारतींचे तिथेच पुनर्वसन करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. तर थेट प्रकल्पबाधित दोन इमारतींमधील रहिवाशांना तात्पुरती कुर्ला येथे संक्रमण शिबिराची जागा देण्यात आली आहे. त्यामुळे आता तरी प्रभादेवी पुलाचा तिढा सुटेल असे वाटत असताना तो आणखी वाढला आहे.
कुर्ल्यातील संक्रमण शिबिरात स्थलांतरित होण्यास दोन्ही इमारतींमधील रहिवाशांनी नकार दिला आहे. प्रभादेवी परिसरातच संक्रमण शिबिरे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याचवेळी १९ इमारतींचा पुनर्विकास तिथल्या तिथे करण्याचे लेखी आश्वासन द्यावे, यासंबंधीचा शासन निर्णय जारी करावा, त्यानंतरच पुलाचे पाडकाम करता येईल, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता प्रभादेवी पुलाचे पाडकाम आणखी लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.
अटल सेतूला जोडणाऱ्या शिवडी-वरळी उन्नत रस्ता प्रकल्पाअंतर्गत मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील १२५ वर्ष जुना प्रभादेवी पूल पाडण्यात येणार आहे. मुंबई महागनर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) त्याजागी नवीन द्विस्तरीय पूल (डबलडेकर) बांधणार आहे. दरम्यान, या पुलाच्या कामात १९ इमारती बाधित होणार होत्या. इतक्या मोठ्या प्रमाणावर पुनर्वसन आणि भूसंपादन आव्हानात्मक असल्याने अखेर एमएमआरडीएने पुलाच्या संरचनेत काही बदल केले. यामुळे १९ पैकी केवळ दोन इमारती प्रकल्पात बाधित होत आहेत. त्यामुळे या दोन इमारतींमधील रहिवाशांना आर्थिक मोबदला देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला. तसा पर्याय प्रकल्पबाधितांसमोर ठेवला.
मात्र हा पर्याय रहिवाशांनी अमान्य केला असून तिथल्या तिथेच कायमस्वरूपी घराची मागणी केली आहे. त्याच वेळी या प्रकल्पामुळे आपल्या इमारतीला धोका निर्माण होण्याची चिन्हे असून आपल्या इमारतींचेही तिथल्या तिथेच पुनर्वसन करावे अशी मागणी १७ इमारतीमधील रहिवाशांनी केली आहे. यामुळे प्रभादेवी पुलाचा तिढा वाढला आहे. या दोन इमारतींच्या पुनर्वसनाचा तिढा सुटलेला नसताना एमएमआरडीएने २५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पुलाच्या पाडकामाला सुरुवात करण्यात येणार होती. मात्र योग्य पुनर्वसन झाल्याशिवाय पूल वाहतुकीसाठी बंद करू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका १९ इमारतींमधील रहिवाशी शुक्रवारी घेतली.
रस्त्यावर उतरून आंदोलन करीत त्यांनी पूल वाहतुकीसाठी बंद करू दिला नाही. या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी सोमवारी एक बैठक घेतली. या बैठकीत १९ इमारतींचे तिथल्या तिथे पुनर्वसन केले जाईल, असा निर्णय घेतला. दोन इमारतींमधील रहिवाशांना कुर्ल्यात संक्रमण शिबीर देण्यात येतील आणि पुनर्वसित इमारती उभ्या राहिल्यानंतर त्यांना घराचा ताबा दिला जाईल, असा ही निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे प्रभादेवी पुलाचा तिढा सुटेल असे वाटत होते.
मात्र हा तिढा काही सुटलेला नाही. दोन इमारतींमधील रहिवाशांनी कुर्ल्यात जाण्यास स्पष्ट नकार दिला. रहिवाशी कोणत्याही परिस्थितीत कुर्ल्याला जाणार नाहीत. तसेच १९ इमारतींचे पुनर्वसन तिथल्या तिथे करण्याबाबत लेखी आश्वासन द्या, शासन निर्णय प्रसिद्ध करा, त्यानंतर आम्ही प्रभादेवी पुलाचे पाडकाम होऊ देऊ, अन्यथा पूल बंद करू दिला जाणार नाही, असा इशारा प्रभादेवीतील स्थानिक रहिवासी श्रीराम पवार यांनी दिला.
दोन इमारतींमधील रहिवाशांना प्रभादेवी परिसर वा आसपासच संक्रमण शिबिराचे गाळे द्यावेत. अन्यथा घरभाडे द्यावेत अशी मागणी थेट बाधित होणाऱ्या हाजी नुरानी इमारतीतील रहिवासी मुनाफ ठाकूर यांनी केली आहे. तर या मागण्या येत्या काही दिवसात पूर्ण झाल्या नाहीत, तर प्रकल्पबाधित कुटुंबासह रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा ठाकूर यांनी दिला.