मुंबई : येत्या शनिवारच्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ३ ते ८ जून या काळात राज्यात गुरांचे बाजार बंद ठेवावेत, असे परिपत्रक गोसेवा आयोगाने जारी केले होते. त्यामुळे मुस्लीम समाजात उमटलेल्या संतप्त प्रतिक्रियेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर त्या वादग्रस्त परिपत्रकातील उल्लेख अखेर बदलण्यात आला. गुरांचा बाजारऐवजी देशी-गोवंशाचा बाजार भरणार नाही, असा उल्लेख करण्यात आला आहे. ईदसाठी मोठ्या प्रमाणावर बकऱ्यांची कुर्बानी दिली जाते. पण गोसेवा आयोगाने ३ ते ८ जून या काळात राज्यातील सर्व गुरांचे बाजार बंद ठेवावेत, असे परिपत्रक काढून कृषी उत्पन्न बाजार समित्यांना या आदेशाचे पालन करण्याची सूचना केली होती. यावर मुस्लीम समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्या मनमानीपणाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती.

मंत्री लोढा, मुंदडा ही मंडळी महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीवर अतिक्रमण करीत असल्याचा आरोप करण्यात आला होता. याची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी गोसेवा आयोगाच्या आदेशात बदल करण्याचे आश्वासन मुस्लीम आमदारांना दिले होते. गुरांचे बाजार बंद ठेवल्यास सण साजरा करणे शक्य होणार नाही याकडे अबू आसीम आझमी, रईस शेख, अमिन पटेल, सना मलिक आदी आमदारांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वादावर पडदा

मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर गोसेवा आयोगाने आधीच्या आदेशात बदल केला आहे. मूळ आदेशात गुरांचे बाजार बंद ठेवावेत, असा उल्लेख होता. पण मंगळवारी जारी करण्यात आलेल्या सुधारित आदेशात देशी गोवंशाचे (गाय, बैल, गोरा) बाजार भरणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असा उल्लेख करण्यात आला. यामुळे ईदवरून निर्माण झालेला वाद निवळला आहे.