राष्ट्रीय चिंतन शिबिरात ना चिंता, ना निषेध; आर्थिक, राजकीय लाभावर चर्चा
राष्ट्रीय स्तरावर चर्मकार समाजाच्या प्रश्नांवर दोन दिवसांचे चिंतन शिबिर पार पडले. या शिबिरात चर्मकार समाजाच्या राजकीय, आर्थिक आणि आरक्षणाच्या प्रश्नांवर चर्चा झाली, परंतु सबंध देश ढवळून काढणाऱ्या आणि दलित समाजाला अस्वस्थ करायला लावणाऱ्या रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्यांच्या आत्महत्येबद्दल ना चिंता व्यक्त करण्यात आली ना निषेधाचा ठराव मंजूर करण्यात आला.
राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष पी. एन. पुनिया यांच्या प्रमुख उपस्थितीत गेल्या आठवडय़ात शिर्डी येथे ५ व ६ मार्च असे दोन दिवस चर्मकार समाजाचे चिंतन शिबिर पार पडले. राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आयोजित केलेल्या या शिबिराला देशभरातून दीड हजार प्रतिनिधी उपस्थित होते, अशी माहिती संघटनेचे एक पदाधिकारी नामदेव कदम यांनी दिली.
या शिबिरात चर्मकार समाजाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रश्नांवर चर्चा झाली. परंतु देशभर दलितांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत परिषदेत अॅड. एन. एस. गायकवाड यांचा अपवाद वगळता कुणी ब्र शब्दही काढला नाही. जातीय अत्याचार रोखण्यासंदर्भात शासकीय यंत्रणेला जाब विचारण्याची जबाबदारी असणाऱ्या अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत झालेल्या या शिबिरात दलितांवरील अत्याचाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले.
या शिबिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाप्रमाणेच संत रविदास यांच्या स्मारकासाठी मुंबईत पाच एकर जमीन देण्यात यावी, भारतीय सेनेत चर्मकार रेजिमेंटचे पुनर्घटन करण्यात यावे, संत रविदास यांच्या नावाने केंद्रात व सर्व राज्यांमध्ये विविध योजना सुरू करण्यात याव्यात, अनेक जाती-उपजातींमध्ये विभागलेल्या चर्मकार समाजाला रविदासी समाज म्हणून संबोधण्यात यावे व तसा कायदा करावा, चर्मकार समाजाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक परिस्थितीचे सर्वेक्षण करण्यासाठी बाबू जगजीवनराम आयोगाची स्थापना करावी, खासगी क्षेत्रातही आरक्षण लागू करावे, अशा मागण्या करणारे ठराव मंजूर करण्यात आले.
हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील बुद्धिमान दलित विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येने देशभरातील दलित समाज विशेषत: महाराष्ट्रातील आंबेडकरी समाज अस्वस्थ झाला आहे.
या घटनेच्या विरोधात आंबेडकरी संघटनांनी-विद्यार्थी संघटनांनी महाराष्ट्रात आंदोलने केली, निषेध केला. या ताज्या घटनेच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रातच झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील चर्मकार समाजाच्या चिंतन शिबिरात राजकीय व आर्थिक लाभांवर चर्चा झाली, परंतु सबंध देश ढवळून काढणाऱ्या रोहित वेमुला याच्या आत्महत्येबद्दल चक्कार शब्द काढण्यात आला नाही. अनुसूचित जातीमधील चर्मकार समाज हा मोठा घटक आहे. परंतु या समाजाच्या राष्ट्रीय स्तरावरील संघटनेच्या शिबिरात रोहितच्या आत्महत्येबद्दल ना चिंता, ना निषेध व्यक्त करण्यात आला.
निषेध ठराव करण्यास विसरलो..!
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे एक नेते व चिंतन शिबिराचे प्रमुख आयोजक बबनराव घोलप यांना त्याबाबत विचारले असता, रोहित वेमुलाच्या आत्महत्येचा निषेध करणारा ठराव करण्यास आम्ही विसरलो अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली.