“शहरात बॉम्ब हल्ले होत असताना आम्ही बंकर मध्ये लपायचो. कधी काय होईल सांगता येत नव्हतं. सुखरूप परतायची आशा नव्हती, पण सुदैवाने मी माझ्या घरी पोहोचली. अशा शब्दात युक्रेन मधून सुखरूप परतलेल्या वसईच्या ऐश्वर्या राठोड या तरुणीने युक्रेनमधील थरारक अनुभव सांगितले.

वसईच्या वसंत नगरी येथे राहणारी ऐश्वर्या राठोड (२१) ही तरुणी युक्रेनमध्ये वैद्यकीय पदवीचे शिक्षण घेण्यासाठी गेली होती. गुरूवारी रात्री ती रोमानियावरून इतर भारतीय विद्यार्थ्यांबरोब सी-१७ या विशेष विमानाने भारतात परतली. युध्दभूमीतून सुखरूप परतल्याचा आनंद तिच्या चेहर्‍यावर दिसत होता. वसईत परतल्यानंतर तिने युक्रेन शहरात आलेले भीषण अनुभव सांगितले.

आम्हाला तेेथे सापत्न वागणूक मिळत होती –

ती विनित्सिया शहरात रहात होती. तिचे तिसरे वर्ष पूर्ण होत आले होते. त्याचवेळी युध्दाचे सावट पसरले. “आम्ही नॅशनल पिरोगावा हॉस्टेलमध्ये रहात होतो. शहरात दोन बॉम्बहल्ले झाले. मुलांना बंकर मध्ये लपायला सांगितले. हा अनुभव भयानक होता. कधी काय घडेल याची खात्री नव्हती त्यामुळे खूप भीती वाटत होती ”, असे ऐश्वर्याने सांगितले. “बाहेर कसे पडायचे हे माहित नव्हते. दरम्यान, दूतावासाने सीमा पार करून रोमानियापर्यंत पोहोचा असे सांगितले होते. आम्ही दाटीवाटीने बस मध्ये बसलो. १२ तासांनी आम्ही रुमानिया सीमेवर पोहोचलो. पण तेथे प्रचंड गर्दी होती. युक्रेन देशातील लोकं देखील देश सोडून जात होते. ते आम्हाला धक्काबुक्की करत होते. आम्हाला तेेथे सापत्न वागणूक मिळत होती. ”, असे तिने सांगितले.

चालून चालून माझे पाय सुजले आणि … –

“आमचे सर्वाधिक हाल सीमेवर झाले. १२ तास आम्ही सीमेवर अडकून पडलो होतो. तापमान उणे सेल्सिअस मध्ये होतं. बर्फ पडत होता. प्रसाधनगृहाची सोय नव्हती. त्यामुळे खूप हाल झाले. ” असे ऐश्वर्या म्हणाली. बसायला देखील जागा नव्हती. एकवेळ वाटलं की आम्ही सुखरूप सीमा पार करू शकणार नाही. पण सुदैवाने आम्ही सीमा पार करू शकलो आणि नंतर भारताच्या सी-१७ विमानाने दिल्लीत आलो. चालून चालून माझे पाय सुजले आणि कमलीचा मानसिक आणि शारिरीक थकवा जाणवत असल्याचे तिने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणि काळजात धस्स झालं होतं –

युध्दाच्या आधी भारतीय मुले युक्रेनमधून का परतली नाही? अशी विचारणा या मुलांना करण्यात येत आहे. त्याला ऐश्वर्याचे वडील गोविंद राठोड यांनी सांगितले की, “ युध्दाची चाहूल लागताच आम्ही फ्लाईट बुक करण्यासाठी प्रयत्न करत होतो. मात्र आम्हाला तिकीट मिळत नव्हते. एकही विमान उपलब्ध नव्हते. “ मी १८ तारखेपासूनच फ्लाईट बुक करतोय. पण एकही फ्लाईट मिळालं नाही. मला ४ मार्चचं तिकिट मिळालं पण ती फ्लाईट देखील मिळू शकली नाही ” , असे ते म्हणाले. या गदारोळात एक भारतीय विद्यार्थी मारला गेल्याची बातमी आली आणि काळजात धस्स झालं होतं ” , असेही ते म्हणाले.