राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधताना ते एका बारचे मालक असल्याचा दावा केलाय. वानखेडे हे मुंबईमधील एका बार आणि रेस्तराँचे मालक असून त्याचा परवाना वानखेडेंच्या नावे आहे, असं मलिक यांनी सूचित केलं आहे. मात्र समीर वानखेडे यांनी यासंदर्भातील एका वृत्ताबद्दल टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

नवाब मलिका यांनी ट्विटरवर सद्गुरु रेस्ट्रो बारचा फोटो शेअर करत वानखेडेंवर निशाणा साधलाय. “समीर दाऊद वानखेडे यांचे हे फर्जीवाडा केंद्र आहे,” अशा कॅप्शनसहीत नवाब मलिक यांनी हा फोटो शेअर केलाय.

मात्र वानखेडे यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना आपण भारतीय महसूल सेवेमध्ये (आयआरएस) रुजू झाल्यापासून हा परवाना आपल्या नावे असल्याचं स्पष्ट केलं आहे. या परवान्यासंदर्भातील कायदेशीर हक्क हे समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्याकडे देण्यात आलेत. “यात बेकायदेशीर असं काहीच नाहीय. मी सेवेमध्ये रुजू झालोय तेव्हापासून म्हणजेच २००६ सालापासून या बार आणि रेस्तराँरंटचा उल्लेख माझ्या वर्षीक स्थावर मालमत्तेमध्ये करत आहे. तसेच या परवान्याबद्दलचाही उल्लेख मी संपत्तीच्या हिशोबात मांडलाय. या उद्योगामधून मिळणाऱ्या कामाईचा सर्व उल्लेख मी प्राप्तीकर परताव्याच्या कागदपत्रांमध्ये केलाय,” असं वानखेडे म्हणालेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समीर वानखेडे यांच्या मालकीचा हा बार आणि रेस्तराँ नवी मुंबईमधील वाशी येथे आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालानुसार वाशीमधील सद्गुरु हॉटेलचा परवाना वानखेडे यांच्या नावे आहेत. हा परवाना २७ ऑक्टोबर १९९७ रोजी जारी करण्यात आला आहे. तसेच हा परवाना रिन्यू करण्यात आला असून सध्या तो ३१ मार्च २०२२ पर्यंत पात्र आहे. या बारमध्ये परदेशी तसेच भारतीय बनावटीच्या दारुची विक्री करण्यास परवानगी देण्यात आलीय.