महाराष्ट्र सरकारने रविवारी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिला. हा पुरस्कार सोहळा रखरखत्या उन्हात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमानंतर १४ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. याचे तीव्र पडसाद आता राजकीय वर्तुळातही उमटताना दिसून येत आहेत. दरम्यान, यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीकास्र सोडलं. तसेच श्रीसेवकाच्या मृत्यूचा आकडा ५०च्यावर गेला आहे, असा दावाही त्यांनी केला. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – खारघर उष्माघात प्रकरणातील मृतांचा शवविच्छेदन अहवाल आला समोर; डॉक्टर म्हणतात, “त्यांच्या शरीरात…”!

काय म्हणाले संजय राऊत?

“खारघर येथे श्रीसेवकांचा पाण्याशिवाय तडफडून मृत्यू झाला. काही कायकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा आकडा ५०च्यावर गेला आहे. मात्र, सरकार हा आकडा लपवते आहे. पाणी मागण्याऱ्या श्रीसेवकांचे बळी या सरकारने घेतले आहेत”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

हेही वाचा – “जळगावमध्ये संजय राऊतांनी चौकटीत बोलावं, नाहीतर सभेत…”, गुलाबराव पाटलांचा इशारा

“हे फडणवीसांचं ढोंग आहे”

“खारघरमधील घटनेवर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला तर बूच लागलं आहे. पालघरमध्ये जमावाने तीन साधूंची हत्या केली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष डहाणूमध्ये ठाण मांडून बसले होते. त्यांनी याचं देशभरात राजकारण केलं. पण ज्या ५० श्रीसेवकांचा मृत्यू झाला, त्यांच्यासाठी फडणवीसांच्या डोळ्यात साधी सहानुभूतीही दिसत नाही. ज्या लोकांनी साधूंच्या हत्येनंतर छाती पिटली, ते लोक आज खारघरमधील ५० जणांच्या मृत्यूनंतर गप्प बसले आहेत. आता देवेंद्र फडणवीसांची माणुसकी मेली आहे का?” अशी टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा – “महाराष्ट्र सरकार जनतेलाच घाबरू लागलंय”, नितीन देशमुखांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर संजय राऊतांचं ट्वीट; म्हणाले, “इथे मोगलाई…!”

“हे सरकार निर्दयी, सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही”

“या घटनेतील मृत्यूंचा आकडा पुढे येऊ नये, यासाठी पैशांच्या माध्यमातून दबावतंत्राचा वापर सुरू आहे. श्रीसेवकांच्याबाबत चर्चा होऊ नये, त्यांच्या कुटुंबियांनी जास्त काही बोलू नये, यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जातो आहे. ज्या लोकांचा मृत्यू झाला, त्यांचे शवविच्छेदन अहवालही समोर आले आहेत. त्यानुसार हे लोक उपाशी होते. त्यांच्या पोटात पाणी सुद्धा नव्हतं. त्यांच्या खाण्यापिण्याची कोणतीही सोय या सरकारने केली नव्हती. इतकं निर्दयी हे सरकार आहे. या सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही”, असेही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नितीन राऊतांवरील कारवाईवरून शिंदे सरकारवर टीकास्र

पुढे बोलताना त्यांनी नितीन देशमुखांवरील कारवाईवरूनही शिंदे सरकारवर टीकास्र सोडलं. नितीन देशमुख पाण्यासाठी संघर्ष यात्रा काढत होते. त्याचा सरकारला त्रास व्हायचं कारण काय? बाळापूर भागातील तीन महिन्याचं बाळही खारयुक्त पाणी पिते. या पाण्यामुळे लोकांचं जीवन संकाटत आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पाण्याची योजना मंजूर केली होती. मात्र फडणवीसांनी त्या योजनेवर स्थगिती आणली. नितीन देशमुख हेच खारयुक्त पाणी फडणवीसांना दाखवण्यासाठी नागरपूरला जात होते होते, पण सरकारने त्यांना अडवलं. राज्यात नेमकं चाललंय काय? हे सरकार मोगलाई परत आणताय का? असं ते म्हणाले.