शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यात त्यांनी सरकारमधील काही नेत्यांचा बाजार बुणगे असा उल्लेख करत भ्रष्टाचाराचा आरोप केलाय. तसेच कर्तव्यदक्ष गृहमंत्री फडणवीस या बाजार बुणग्यांवर कठोर कारवाई कधी करणार? असा सवाल केला. त्यांनी ट्विटरवर हे पत्र शेअर करत प्रतिक्रिया दिली.

फडणवीसांना पाठवलेलं पत्र शेअर करत संजय राऊत यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं, “महाराष्ट्राचे कर्तबगार, कर्तव्य तत्पर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी तसेच शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी केलेली विनंती. बाजार बुणगे सरकारात आहेत.आपल्या सोबत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई कधी करणारं?”

“देवेंद्रजी आपले कौतुक करावे तेवढे थोडेच”

संजय राऊत फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात म्हणाले, “आताच (१ एप्रिल) मी आपले एक विधान ऐकले व गृहमंत्री म्हणून आपला अभिमान वाटला. आपण म्हणता. “मी गृहमंत्री झाल्यापासून अनेकांची अडचण झाली आहे. बेकायदेशीर कामे करणाऱ्यांना मी सोडणार नाही व त्यांच्यावर कठोर कारवाई करणार म्हणजे करणार!” देवेंद्रजी आपण घेतलेल्या या भूमिकेबद्दल आपले कौतुक करावे तेवढे थोडेच, पण आपण जे बोलत आहात तसे महाराष्ट्रात खरोखरच घडते आहे काय?”

“चार महिन्यांपासून फडणवीस भेट देण्यास टाळाटाळ करत आहेत”

“आपल्या सरकारमधील अनेकांची बेकायदेशीर कृत्ये व लांड्यालबाड्या याबाबत कारवाई करण्याबाबत मी आपल्याकडे पुराव्यांसह येऊन भेटू इच्छितो. गेल्या चार महिन्यांपासून आपण मला याबाबत भेट देण्यास टाळाटाळ करीत आहात. मी भ्रष्टाचार व बेकायदेशीर प्रकरणांबाबत आपली भेट घेऊ इच्छितो”, असं संजय राऊत यांनी पत्रात म्हटलं.

हेही वाचा : “मोदी सूर्य, चंद्र आणि धूमकेतू आहेत”, राऊतांच्या टीकेला चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाले, “तुरुंगात…”

“५०० कोटींचे मनीलाँडरिंग झाल्याचे पुरावे”

संजय राऊत पत्रात पुढे लिहितात, “भाजपाचे आमदार सन्माननीय राहुल कुल यांच्या नेतृत्वाखालील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात (ता. दौंड) प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. शेतकऱ्यांच्या पैशांची अक्षरशः लुटमार झाली असून किमान ५०० कोटींचे मनीलाँडरिंग झाल्याचे पुरावे समोर आले आहेत. संबंधित कारखान्यांचे पदाधिकारी व शेतकरी प्रतिनिधी यांच्यासह मी आपली या बेकायदेशीर प्रकरणावर कारवाई व्हावी म्हणून भेट घेऊ इच्छितो.”

“दादा भुसेंनी शेतकऱ्यांकडून १७८ कोटींचे शेअर्स गोळा केले”

“आपल्या मंत्रिमंडळातील दादा भुसे (मालेगाव) यांनी गिरणा अॅग्रो’ नावाने १७८ कोटींचे २५ लाख शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा केले. गिरणा कारखाना वाचविण्यासाठी भुसे यांनी हे पैसे गोळा केले. या रकमेचा अपहार झाला असून कंपनीच्या वेबसाईटवर केवळ १ कोटी ६७ लाखांचे शेअर्स फक्त ४७ शेतकऱ्यांच्या नावावर दाखवले. या अशा भ्रष्टाचारी कृत्याबाबत कोणालाही पाठीशी न घालण्याचे आपले धोरण असायला हवे. त्या भ्रष्टाचाराबाबत मी आपणास अधिक माहिती देऊ इच्छितो,” असं संजय राऊतांनी म्हटलं.

हेही वाचा : संजय राऊतांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीवर प्रतिक्रिया, म्हणाले, “मला वाटतं की…”

“जनतेच्या पैशांवर सुरू असलेली दरोडेखोरी थांबवावी”

“किरीट सोमय्या यांनी ‘विक्रांत’ युद्ध नौका वाचविण्यासाठी जनतेकडून पैसे जमा केले. त्याचाही हिशेब दिलेला नाही. उलट राज्यात तुम्ही गृहमंत्री होताच मुंबई पोलिसांनी या गुन्ह्याची चौकशी थांबवून सोमय्या यांना ‘क्लीन चिट’ दिली हे धक्कादायक आहे. अशा सर्व बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करून जनतेच्या पैशांवर सुरू असलेली दरोडेखोरी थांबवावी, अशी माझी विनंती आहे. वरील बेकायदेशीर प्रकरणांबाबत ‘पुरावे’ सादर करण्यासाठी मी आपणास भेटू इच्छितो. कृपया आपल्या सोयीची वेळ कळवावी,” असंही राऊतांनी नमूद केलं.