प्रमाणापेक्षा कमी वजनाने जन्मलेल्या मुलांना मध्यम वयात हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब असे विकार आपसूक जडतात, असे निरीक्षण आहे. सशक्त मुले जन्माला यावीत, त्यांच्या अवयवांची पूर्ण वाढ व्हावी, अवयव सुदृढ व्हावेत आणि मध्यम वयात विकार जडू नयेत, यासाठी ‘सेंटर फॉर दी स्टडी ऑफ सोशल चेंज’ (सीएसएससी)या संस्थेने अभ्यास सुरू केला. गर्भधारणेपूर्वीच दूध, पालेभाज्या आणि फळांचा प्रमाणित, पोषक आहार पुरविण्यास सुरुवात केली. ज्या महिलांना किमान तीन महिने हा आहार घेतला त्यांनी जन्म दिलेल्या बाळांचे वजन अन्य बळांच्या तुलनेत वाढल्याचे आढळले. सध्या या प्रयोगाच्या दुसऱ्या टप्प्यात या मातांनी जन्म दिलेल्या सुमारे १८०० बालकांच्या शारीरिक वाढीसोबत बुद्धिमत्ता विकासाची चाचणी सुरू आहे.

केवळ ‘सरस’च नव्हे तर सुदृढ व सक्षम समाज धडविण्यासाठी सीएसएससी हा संस्था गेल्या चार दशकांहून अधिक काळ मुंबईतील वस्त्यांमध्ये निरपेक्षपणे कार्य करीत आहे. संस्थेच्या सहभागापासून थोरा-मोठय़ांची प्रेरणा व सहभाग साभलेल्या या संस्थेने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यांच्या कामाची दखल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. संस्थेच्या कामाचा आवाका जेवढा वाढत गेला तसे त्याच्या पूर्ततेसाठीचा निधी उभा करणे हे मोठेच आव्हान आहे.

‘सीएसएससी’ने हा प्रयोग २००५ मध्ये इंग्लंडमधील साऊथहॅम्प्टन विद्यापीठ आणि ‘मेडिकल रिसर्च काऊन्सिल’च्या लाईफकोर्स अ‍ॅपिडॅमीलॉजी विभागाच्या सहकार्याने सुरू केला. मुंबईच्या वांद्रे आणि अंधेरीत या उपनगरांतील झोपडपट्टय़ांमध्ये राहणाऱ्या सुमारे साडेसहा हजार मातांवर हा प्रयोग करण्यात आला.

‘सीएसएससी’ने या प्रयोगाला ‘सरस’ असे नाव दिले. सरस उपक्रमाचे  प्रमुख डॉ. सिराजुल सहारिया सांगतात, भारत ही २०२०पर्यंत मधुमेहींची राजधानी बनेल असे जागतिक आरोग्य संघटनेचे अनुमान आहे. भारतात जन्मलेल्या एक तृतीयांश बालकांचे वजन जन्मत:च कमी असते. ही बालके अशक्त असतात. तोच अशक्तपणा घेऊन बालकांची वाढ होते. म्हणजे इतरांप्रमाणे उंची, वजन वाढलेले असते. पण ती सशक्त नसतात. अशा बालकांना पुढे हृदयविकार, मधुमेह किंवा रक्तदाबाचे विकार जडतात. ही परिस्थिती लक्षात घेऊन सीएसएससी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. रमेश पोतदार यांच्या पुढाकाराने गर्भधारणा होण्यापूर्वीच मातांना सुदृढ करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यातून या प्रयोगाला सुरुवात झाली.

‘माणूस’ घडवणारे उपक्रम

‘सीएसएससी’चे वांद्रे पूर्वेकडील वस्त्यांमध्ये २० दवाखाने चालत होते. आरोग्यसेवेसह अन्य उपक्रमांमधून या परिसरातल्या सुमारे एक लाख कुटुंबांपर्यंत संपर्क साधण्यात आला.

नुकतंच लग्न झालेल्या किंवा मातृत्वाची स्वप्ने पाहणाऱ्या विवाहित महिलांना या प्रयोगात सहभागी करून घेण्यात आले. दूध, फळे आणि पालेभाज्यांचा प्रमाणित आहार ‘सीएसएससी’च्या उपाहारगृहात तयार करून या विवाहितांपर्यंत पोहोचवण्यात येऊ लागला. गर्भधारणेपूर्वी किमान तीन महिने, सोमवार ते शनिवार असे सहा दिवस हा पोषक आहार घ्यावा, अशी धडपड सुरू झाली.

कोणी किती आहार घेतला याच्या नोंदी ठेवणे आवश्यक होते. त्यामुळे ‘सीएसएससी’च्या आरोग्य केंद्रांवरील सेविकांसमक्ष हा आहार महिलांनी घ्यावा अशी अट होती. यादरम्यान सुमारे १८०० गर्भवती महिलांच्या वैद्यकीय चाचण्या, या काळात त्यांनी घ्यावयाची काळजी, आहार यावर अधिक जोर देण्यात आला. प्रसूतीनंतर १८०० बालकांचे तपशील नोंदवण्यात आले.

अन्य बालकांच्या तुलनेत या सरस बालकांचे वजन सरासरी शंभर ग्रॅमने जास्त आढळले. गर्भधारणेनंतर अनेक महिलांमध्ये मधुमेह बळावतो. सीएसएससीने पुरवलेल्या पोषक आहारामुळे हे प्रमाण ५० टक्क्य़ांनी कमी झाले, अशी माहितीही डॉ. सहारिया यांनी दिली.