गोवंडी परिसरातील आनंदनगर येथील संजीवनी सोसायटीच्या इमारतीखाली असणारी जलवाहिनी फुटल्याने एका वयोवृद्धेचा जागीच मृत्यू झाला तर १४ जण जखमी झाले. जलवाहिनीवर अनधिकृतपणे इमारत उभारणाऱ्या आणि खोटी माहिती देऊन लोकांच्या माथी अशी घरे लादणाऱ्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर गोवंडी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या परिसरात पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत उभारण्यात आलेली इमारत संपूर्णपणे जलवाहिनीवर आहे. घरे विकत घेताना रहिवाशांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी जलवाहिनी बंद स्थितीत असल्याची माहिती देऊन त्याच्यांवर ही घरे लादण्यात आली. मात्र या इमारतीला  पालिका अधिकाऱ्यांनी परवानगी कशी दिली, असा सवाल उपस्थित केला जात आहे. गेल्या सात वषार्ंपासून उभ्या असणाऱ्या या इमारतीत अनेक कुटुंबे राहतात. सोमवारी पहाटे साडेचारच्या दरम्यान जलवाहिनी फुटली आणि त्यामुळे परिसरात गोंधळ उडाला. तळमजल्यावरील अनेक घरांमध्ये पाण्याचे फवारे उडू लागले तर काहींच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे एकाच वेळी घराबाहेर पडण्यासाठी रहिवाशांची पळापळा झाली. काहींनी लहानग्यांना खांद्यावर घेऊन घराबाहेर काढले. मात्र देवीसिंग हजारे या ६० वर्षे वयाच्या वृध्देचा नाका-तोडात पाणी गेल्याने जागीच मृत्यू झाला.
जलवाहिनी फुटल्यामुळे अनेकांच्या घराचे नुकसान झाल्याने लोकांनी पदपथाचा आसरा घेतला आहे. त्यातच इमारत अनधिकृत असल्याचे जाहीर झाल्याने लोकांमध्ये घबराट पसरली आहे.
मुंब्रा येथील शीळ परिसरातील अनधिकृत इमारत कोसळल्याची घटना ताजी असतानाच मुंबईतील गोवंडीतील अनधिकृत इमारतीचे प्रकरण आता पुढे आले आहे. या इमारतीखाली असलेली जलवाहिनी फुटल्याने एकच हाहाकार माजला. आपल्या इमारतीखालून प्रचंड दाबाची जलवाहिनी जात असल्याचे विदारक सत्य कळल्यावर अनेकांची पाचावर धारण बसली. या इमारतीखाली जलवाहिनी असल्याची कल्पना होती.
परंतु ती बंद स्थितीत असल्याचे आम्हाला सांगण्यात आले होते. आमची दिशाभूल करून आम्हाला घरे विकण्यात आल्याची माहिती काही रहिवाशांनी दिली.