सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी हिंमत असेल तर आदित्य ठाकरे यांचं नाव घ्यावं असं खुलं आव्हानच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलं आहे. “आदित्य ठाकरेंचा या सर्व प्रकरणाशी काय संबंध? हिंमत असेल तर भाजपाच्या लोकांना जाहीरपणे त्यांचं नाव घ्यावं. ते चांगलं काम करत आहेत, मदत करत आहेत. बदनामी करण्याची मोहीम सुरु असून हे चांगलं राजकारण नाही,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

“एका उभरत्या नेतृत्त्वाचं खच्चीकरण करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर काय फायदा होणार आहे. हे राज्याचंच नुकसान आहे. कोणत्याही पक्षातील युवा नेत्यांचं खच्चीकरण केलं जाऊ नये,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख केला जात असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता संजय राऊत यांनी, बदनामी करण्याची मोहीम सुरु असून हिंमत असेल तर नाव घ्या असं आव्हान देत हे चांगल्या संस्कृतीचं राजकारण नाही अशी टीका केली.

आणखी वाचा- “सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलिसांची प्रतिमा ठाकरे सरकारने मलीन केली”

चौकशीबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, “ईडी चौकशी करत आहे तर करु देत. कायदा आम्हालाही माहिती आहे. कायदा तयार होतो तेव्हा आम्हीही संसदेत असतो. कायदा कसा मोडला जातो हेदेखील आम्ही पाहिलं आहे. ज्यांना जो तपास करायचा आहे तो करु देत. सत्य समोर आलं पाहिजे असं मलाही वाटतं. सुशांत सिंह मुंबईचा मुलगा आहे. कोणी कितीही दावा केला तरी तो मुंबईचा आहे. त्याला न्याय देण्याची आमची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. मुंबई पोलीस आणि सरकारचं ते दायित्व आहे”.

आणखी वाचा- महाराष्ट्र पोलिसांनी सुशांत सिंहच्या वडिलांवर केला हा गंभीर आरोप

“जर तपासात चूक होत असेल तर सांगण्याचा तुम्हाला अधिकार आहे. पण काही लोक राजकारण करत आहेत. बिहारमधील राजकारणासाठी तुम्ही बिहार पोलिसांकडे तपास देता आणि ते मुंबईत येतात हे चुकीचं आहे,” असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.