शहरी नक्षलवादाच्या आरोपांप्रकरणी अटकेत असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांना उच्च न्यायालयाने मंजूर केलेला जामीन शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयानेही योग्य ठरवला. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विशेष न्यायालयानेही शुक्रवारी सायंकाळीच तेलतुंबडे यांची तळोजा कारागृहातून सुटका करण्याचे आदेश काढले. त्यामुळे तेलतुंबडे यांची शनिवारी तळोजा कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे. तेलतुंबडे हे एप्रिल २०२० पासून अटकेत आहेत. शिवाय तेलतुंबडे यांचा कोणत्याही दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग होता हे सकृतदर्शनी म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे तेलतुंबडे यांचा भाऊ मिलिंद तेलतुंबडे हा कुख्यात नक्षलवादी होता, म्हणून ते बेकायदा कारवायांमध्ये सहभागी होते, असे म्हणता येणार नाही. शिवाय तेलतुंबडे हे विविध विषयांवरील व्याख्यानांसाठी परदेशी जायचे, असे नमूद करून या सगळ्या मुद्यांवर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने तेलतुंबडे यांना जामीन मंजूर केला होता. तेलतुंबडे यांचा दहशतवादी कारवायांत सकृतदर्शनी सहभाग स्पष्ट होत नसल्याची टिप्पणीही न्यायालयाने त्यांना दिलासा देताना केली होती.

हेही वाचा >>>पत्राचाळ घोटाळा प्रकरण : ईडीला HC चा पुन्हा धक्का; राऊतांच्या जामीनाविरोधातील याचिकेवर सुनावणीस नकार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विनंतीवरून न्यायालयाने आपल्या आदेशाला एक आठवड्याची स्थगिती दिली होती. एनआयने त्यानंतर या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.  त्या पार्श्वभूमीवर तेलतुंबडे यांच्या वकिलांनी मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयात धाव घेऊन तेलतुंबडे यांच्या कारागृहातील सुटकेचा आदेश काढावा, अशी मागणी केली. तसेच तेलतुंबडे यांच्या जामिनाची हमी म्हणून रोख एक लाख रुपये न्यायालयात जमा केले. विशेष न्यायालयाने तेलतुंबडे यांच्या वकिलांची मागणी मान्य करून तेलतुंबडे यांची तळोजा कारागृहातून सुटका करण्याचे आदेश शुक्रवारी सायंकाळी काढले. हे आदेश तळोजा कारागृह प्रशासनाकडे सादर करण्यात आल्यावर आवश्यक त्या कायदेशीर प्रक्रियेनंतर तेलतुंबडे यांनी शनिवारी तळोजा कारागृहातून सुटका होईल.