मुंबई: नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्गवरून एसटीही धावणार आहे. या मार्गांवर १५ डिसेंबरपासून शयनयान आणि आसन व्यवस्था असलेली बसगाडी सुरू करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. समृद्धी महामार्गावरील नागपूर – शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते ११ डिसेंबर रोजी पार पडले. यानंतर महामंडळाने ३० आसने (पुशबॅक पध्दतीची) आणि १५ शयनयान (स्लीपर) सुविधा असलेली नागपूर आणि शिर्डी या दोन्ही ठिकाणांहून बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही मार्गांवरून दररोज रात्री ०९.०० वाजता बस सुटेल व पहाटे ०५.३० वाजता गंतव्य ठिकाणी पोहोचेल. या बससेवेमुळे प्रवाशांच्या सध्याच्या प्रवास अंतरात १०२.५ किलोमीटर आणि वेळेमध्ये सव्वाचार तासांची बचत होणार आहे.

हेही वाचा >>> जुहूतील आठ एकर भूखंड म्हाडाचाच!; विशेष वकिलाची नियुक्ती

या बसमधून प्रवास करण्यासाठी प्रति प्रवासी १,३०० रुपये आणि मुलांसाठी ६७० रुपये प्रवासभाडे आकारण्यात येणार आहे. तसेच ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत, तर ६५ ते ७५ दरम्यानच्या ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलतीत प्रवास करता यणार आहे. याबरोबरच नागपूर औरंगाबाद (जालना मार्गे) या मार्गावरही समृध्दी महामार्गाप्रमाणेच शयन – आसनी बससेवा सुरू करण्यात येत आहे. नागपूर व औरंगाबाद या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री १०.०० वाजता ही बस सुटेल व जालना मार्गे पहाटे ०५.३० वाजता पोहोचेल. 

हेही वाचा >>> ‘जी २०’मुळे सागरी किनारा मार्गाचे काम दोन दिवस बंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बससेवेमुळे प्रवाशांच्या प्रवास अंतरात ५०.९ किलोमीटर आणि प्रवास वेळेमध्ये चार तास 40 मिनिटांची बचत होणार आहे. नागपूर – औरंगाबाद या प्रवासासाठी १,१०० रुपये आणि मुलांसाठी ५७५ रुपये इतके प्रवासभाडे आकारण्यात येणार आहे, तर नागपूर – जालना  प्रवासासाठी प्रति व्यक्ती ९४५ रुपये आणि मुलांसाठी ५०५ रुपये इतके प्रवासभाडे असेल, अशी माहिती एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.