मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पारा चढलेला असून, संपूर्ण राज्यात कडक उन्हाचा दाह सोसावा लागत आहे. राज्यातील बहुतांश केंद्रांतील कमाल तापमान ३० ते ३६ अंशादरम्यान होते. तर, किमान तापमान २० अंशापुढे होते. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामधील नागरिक दिवसा आणि रात्री उकाडय़ाने हैराण झाले होते. गेल्या शुक्रवार-शनिवारी मुंबईतील तापमानाने देशात उच्चांक गाठला होता. त्यामुळे मुंबई सर्वात ‘उष्ण शहर’ ठरले. मात्र, येत्या काही दिवसात नागरिकांना डिसेंबरमधील थंडी अनुभवता येण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 डिसेंबर महिन्यात थंडीने हुडहुडी भरताच शेकोटी समोर बसून शेकण्यास आणि गरम कपडे घालण्यास सुरुवात होते. तसेच, गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी अनेक जण बाहेरगावी जातात. मात्र, ‘मंदौस’ चक्रीवादळामुळे यंदा डिसेंबरच्या पहिल्या पंधरवडय़ात थंडी अनुभवता आली नाही. आता चक्रीवादळाचा परिणाम पूर्णपणे ओसरल्यानंतर आणि उत्तर भारतात एकापाठोपाठ एक पश्चिमी झंझावाताच्या परिणामामुळे राज्यातील किमान आणि कमाल तापमानात हळूहळू घसरण होत आहे. मात्र सरासरी तापमानापेक्षा ते दोन अंशाने अधिक आहे. यात घसरण होणार असून रात्रीच्या थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारपासून संपूर्ण राज्यात पहाटेच्या किमान तापमानात घट होऊन १० अंश सेल्सिअसपर्यंत तर दुपारच्या कमाल तापमानातही घट होऊन २९ अंश सेल्सिअसपर्यंत स्थिरावण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता डिसेंबर महिन्यातील उर्वरित दिवसात थंडीत वाढ होईल आणि ती डिसेंबरअखेपर्यंत टिकून राहण्याची शक्यता आहे. तसेच थंडीचा परिणाम राज्यासह दक्षिण गुजरात, दक्षिण मध्य प्रदेशातही जाणवण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

More Stories onसर्दीCold
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State temperature citizens during the day night with heat mumbai hot city ysh
First published on: 20-12-2022 at 00:54 IST