मुंबई : अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरता आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन अकरावी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्याचा निर्णय शिक्षण संचालनालयाने घेतला आहे. त्यानुसार २२ मे रोजी दुपारी ३ वाजता पहिल्या फेरीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार १९ व २० मे रोजी सराव अर्ज उपलब्ध करण्यात आले होते. त्यानंतर २१ मे ते १३ जून या कालावधीत पहिल्या फेरीसाठी विद्यार्थी नोंदणी, प्राधान्यक्रम व उच्च माध्यमिक विद्यालयांची अलॉटमेंट इत्यादीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र २१ मे २०२५ रोजी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे संकेतस्थळ तांत्रिक कारणास्तव बंद होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना नोंदणी व प्राध्यान्यक्रम भरणे शक्य झाले नाही. परिणामी विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे तांत्रिक अडचण दुरुस्त करण्यासाठी लागणारा कालावधी आणि विद्यार्थी हित लक्षात घेऊन अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीचे सुधारित वेळापत्रक २२ मे २०२५ रोजी दुपारी ३ वाजता घोषित करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली.

विद्यार्थी व पालकांनी गोंधळून जाऊ नयेअकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर अर्ज भरण्यास विलंबाने सुरुवात झाली असली तरी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास व पसंतीक्रम नोंदविण्यास पुरेसा कालावधी देण्यात येईल. तांत्रिक अडचणी दुरुस्त केल्यानंतर प्रवेशाचे संकेतस्थळ परिपूर्ण व उत्कृष्ट स्वरुपात उपलब्ध होईल. संकेतस्थळावर कोणतीही छोट्यात छोटी त्रुटी राहू नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यार्थ्यांना अर्ज भरणे सोईचे व सुलभ व्हावे व एकंदर प्रवेशाची कार्यवाही कमीत कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी पुरेसा वेळ व योग्य सोयी-सुविधा, मार्गदर्शन विद्यार्थी व पालकांना पुरविले जाईल. तरी कोणीही गोंधळून जाऊ नये, असे आवाहनही डॉ. महेश पालकर यांनी केले.संकेतस्थळ सुरू होण्याची वेळ ऑनलाईन कळवणारअकरावी प्रवेशाचे संकेतस्थळ सायंकाळी विलंबाने सुरू झाले, तरी त्यावर अर्ज नोंदणी करण्याचा पर्याय उपलब्ध नव्हता. त्यामुळे संकेतस्थळ सुरू झाले तरी विद्यार्थ्यांना अर्ज करता येत नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांना पोर्टल सुरू होण्याची वेळ ऑनलाईन दर्शविण्याबरोबरच ई-मेल व मोबाइल संदेशाद्वारे कळविण्यात येणार आहे. त्रुटीसह अर्ज भरण्याची सुविधा देण्याऐवजी संकेतस्थळ सुलभ व त्रुटीरहित करून सुरू करण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचेही डॉ. महेश पालकर यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले.