मुंबई : मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गावरील शेवटच्या इगतपुरी - आमणे (ठाणे) टप्प्याचे काम अत्यंत आव्हानात्मक आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हे काम मे २०२४ पर्यंत पूर्ण होईल असे जाहीर केले आहे. आतापर्यंत डिसेंबर २०२३ मध्ये शेवटचा टप्पा पूर्ण होईल असे सांगण्यात येत होते. मुंबई - नागपूर समृद्धी महामार्ग एकूण ७०१ किमी लांबीचा असून नागपूर - भरवीरदरम्यानचा ६०० किमी लांबीचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. तर, तिसऱ्या टप्प्यातील भरवीर - इगतपुरी आणि चौथ्या टप्प्यातील इगतपुरी - आमणेदरम्यानच्या महामार्गाचे काम सध्या वेगात सुरू आहे. भरवीर - इगतपुरी टप्प्याचे काम दिवाळीच्या आसपास पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर तात्काळ हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल केला जाईल, असे एमएसआरडीसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यातील इगतपुरी - आमणेदरम्यानचा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल करण्यासाठी डिसेंबर २०२३चा मुहूर्त जाहीर करण्यात आला होता. दुसऱ्या टप्प्यातील शिर्डी - भरवीर महामार्गाच्या लोकार्पणाच्या वेळी २६ मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवटचा टप्पा डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण होईल असे जाहीर केले होते. तर, एमएसआरडीसीनेही डिसेंबरमध्ये काम पूर्ण होईल, असे अनेक वेळा स्पष्ट केले होते.चौथा टप्प्याचे काम मे २०२४ मध्ये पूर्ण होईल आणि त्यानंतर हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होईल, अशी माहिती एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली. शेवटच्या टप्प्यात तब्बल १२ बोगदे.. मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्यात तब्बल १२ बोगदे असून यातील एक बोगदा आठ किमी लांबीचा आहे. तर, उर्वरित ११ बोगदे सरासरी एक किमी लांबीचे आहेत. हे बोगदे कसारा घाटातून जाणार असून त्यामुळे कसाराघाट अगदी पाच-सहा मिनिटांत पार करता येणार आहे. त्याच वेळी या टप्प्यात १६ ‘व्हायाडक्ट’चाही (उंच पूल, दरीवरून रेल्वे मार्गावरून जाणारा रस्ता) समावेश आहे. नाशिकमधील वशाळा येथील एका दरीवरून महामार्ग जाणार असून येथील पुलाचे खांब तब्बल ८४ मीटर म्हणजेच २७५ फूट उंच आहेत. हे काम सर्वाधिक आव्हानात्मक आहे. पावसाळय़ात या भागात काम करणे अशक्यप्राय आहे. त्यामुळे सध्या तेथील काम बंद आहे. पावसाळय़ानंतरच या टप्प्यातील काम वेग घेईल.