मुंबई : गेले अनेक दिवस मुंबई शहर, तसेच उपनगरांत उकाड्याचा प्रभाव होता. गरम हवा, आर्द्रतेमुळे होणाऱ्या काहिलीमुळे नागरिक त्रस्त होते. मात्र, मागील तीन – चार दिवसांपासून मुंबईतील किमान तापमानात अधूनमधून घट झाली असून पहाटे गारवा जाणवू लागला आहे. मुंबईशिवाय कल्याण, ठाणे या पट्ट्यातही दोन दिवसांपासून तापमानाचा पारा खाली आला आहे.

हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी २५ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात २२.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मुंबईमधून मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना सतत उकाडा सहन करावा लागत होता. तसेच कमाल तापमानातही सरासरीपेक्षा वाढ झाली होती. दरम्यान, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मुंबईत थंडीची चाहुल लागली आहे. तसेच मागील दोन ते तीन दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा खाली आल्याने दिवसभराचा उकाडा काहीसा कमी झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडून राज्यात थंड वारे येत आहेत. त्यामुळे मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे पहाटे, तसेच मध्यरात्री हवेत गारवा जाणवत असून नागरिकांना दिलासा मिळत आहे. या बदलत्या वातावरणामुळे मुंबईत थंडीची चाहुल लागली आहे.

हेही वाचा >>>दोन स्थानकांमध्ये भुयारात मेट्रो बंद, एमएमआरसीकडून प्रवाशांची सुखरूप सुटका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईत गुरुवारी दुपारीही दिलासादायक वातावरण होते. दरम्यान, मुंबईच्या कमाल तापमानामध्ये रविवारपेक्षा फार मोठा बदल झाला नसला, तरी गुरुवारी दुपारी वाऱ्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला. किमान तापमानात घट झाल्यामुळे पहाटे गारवा जाणवत असला तरी या मोसमातील अपेक्षित थंडी मात्र अजून सुरू झालेली नाही, असे हवामान विभागाने सांगितले.