मुंबई : अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत करण्यात येणाऱ्या महत्त्वपूर्ण बदलासंदर्भातील अधिसूचना शुक्रवारी राज्य सरकारने जाहीर केली. त्यामुळे या अभ्यासक्रमांसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला असून, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून लवकरच प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल करून तीनऐवजी चार फेऱ्या घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पहिल्या फेरीमध्ये प्रथम प्राधान्य, दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीमध्ये अनुक्रमे पहिले तीन व पहिले सहा महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम बंधनकारक असणार आहेत. फेरीनुसार निश्चित केलेल्या प्राधान्यक्रमानुसार विद्यार्थ्यांनी त्या जागांवर प्रवेश न घेतल्यास त्यांचा त्या जागेवरील दावा आपोआप रद्द होईल. त्याचप्रमाणे हे विद्यार्थी पुढील फेरीसाठी पात्र ठरणार नाहीत.

तसेच दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या फेरीसाठी पात्र उमेदवारांना पुन्हा एकदा ऑनलाइन प्राधान्यक्रम भरण्याची किंवा त्यात बदल करण्याची मुभा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. मात्र त्यासंदर्भात कोणतीही अधिसूचना जारी करण्यात आली नसल्याने १६ जून रोजी एमएचटी सीईटीचा निकाल जाहीर होऊनही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात अडचणी येत होत्या. मात्र राज्य सरकारने शुक्रवारी अधिसूचना जारी केल्याने प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

काय आहेत नवीन बदल ?

अभियांत्रिकी प्रवेशासाठी आता तीनऐवजी चार केंद्रीभूत प्रवेश फेऱ्या होणार आहेत. तसेच पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत अनुक्रमे एक, तीन आणि सहा पसंतीक्रमांचे महाविद्यालय मिळाल्यास, संबंधित विद्यार्थ्या त्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे. चार फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरच संस्थात्मक प्रवेश फेरी राबविण्यात येणार असून, या फेरीमध्ये गुणवत्ता यादी जाहीर करून गुणवत्तेनुसारच प्रवेश दिले जाणार असल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यार्थ्यांना दिलासा

संस्थात्मक फेरीमध्ये एखाद्या विद्यार्थ्यांने केलेला अर्ज संबंधित महाविद्यालयाच्या प्रशासनाने घेण्यास नकार दिला, तर विद्यार्थ्यांना सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर त्या महाविद्यालयाच्या संस्थात्मक फेरीसाठी अर्ज करता येणार आहे. महाविद्यालयाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या गुणवत्ता यादीमध्ये त्या विद्यार्थ्यांच्या अर्जाचा समावेश असल्याने विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती डॉ. विनोद मोहितकर यांनी दिली.