मुंबई : सोमय्या विद्याविहार विद्यापीठाच्या तीन महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी बनावट गुणपत्रिका बनवल्याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांसह तिघांना टिळक नगर पोलिसांनी सोमवारी अटक केली. आरोपींनी पालकांकडून पैसे घेऊन सुमारे ५० विद्यार्थ्यांच्या नावाने बनावट गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला व ई-मेल आयडी बनवून त्यांना ११ वीसाठी प्रवेश मिळवून दिल्याचा आरोप आहे. सोमय्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी स्वत: पडताळणी समिती स्थापन करून हा सर्व प्रकार उघडकीस आणला. त्यानंतर त्यांनी याबाबत टिळक नगर पोलिसांकडे तक्रार केली.

के. जे. सोमय्या कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशन पवार यांनी स्वत: या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली होती. तक्रारीनुसार, सोमय्या विद्याविहार विद्यापीठाअंतर्गत असलेल्या के.जे. सोमय्या विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, एस. के सोमय्या विनय मंदिर सेकंडरी स्कूल व ज्युनियर कॉलेज व के.जे. सोमय्या कला आणि वाणिज्य या तीन महाविद्यालयांमध्ये आरोपींनी गैरप्रकार केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी महेश विष्णू पाटील (४९), अर्जुन वसाराम राठोड (४३) व देवेंद्र सूर्यकांत सायदे (५५) यांना टिळक नगर पोलिसांनी अटक केली. यातील पाटील आणि राठोड हे लिपिक पदावर काम करत होते.

हेही वाचा >>>सरकारलाच माहिती अधिकार नकोसा लाखभर नागरिकांच्या अर्जांवर निर्णयाची प्रतीक्षा;अनेक पदेही रिक्त

५० विद्यार्थ्यांचा बनावट प्रवेश

या टोळीने सुमारे ५० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून दिल्याचा आरोप आहे. त्यात मुख्यत: सीबीएससी, आयबी, आयसीएसई व आयजीसीएसईसारख्या मंडळातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडली. त्यात एसएससी मंडळातील विद्यार्थ्यांची माहिती यंत्रणेत उपलब्ध होती. यात मंडळातील विद्यार्थ्यांचे गुण, शाळा अशी माहिती स्वत: भरावी लागत होती. आरोपीने याच गोष्टीचा फायदा घेऊन या ५० विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी बनावट गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला व ई-मेल आयडी तयार करून यंत्रणेत खोटी माहिती भरली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आर्थिक व्यवहार झाल्याचे उघड

तक्रारदार प्राचार्य पवार यांना जून महिन्यात याबाबत संशय आला. तीन याद्यांमध्ये नाव नसलेल्या अशा काही संशयास्पद प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधला असता हा प्रकार उघड झाला. आरोपींनी विद्यार्थ्यांच्या पालकांकडे प्रत्येकी दीड ते दोन लाख रुपयांची मागणी केल्याचे पोलीस तपासात समजले. २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता ११ वीला मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देतो, अशी बतावणी करीत आरोपींनी पालकांची फसवणूक केली.