मुंबई : दक्षिण मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात बकरी ईदनिमित्त सामूहिक नमाज पठण करण्याची परवानगी मागणाऱ्या याचिकाकर्त्यांच्या निवेदनावर आजच निर्णय घ्या, असे आदेश शुक्रवारी उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाला दिले होते. मात्र, नमाजाला परवानगी देण्यात आली की नाही हे रात्री उशिरापर्यंत कळू शकले नाही.

गावदेवी पोलिसांनी सामूहिक नमाज पठणासाठी परवानगी नाकारल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते उमर अब्दुल जब्बार गोपालानी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेची न्यायमूर्ती नीला गोखले आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने दखल घेतली. तसेच, राज्य सरकारच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विभागाकडे या संदर्भात निवेदन सादर करण्याची सूचना याचिकाकर्त्यांना केली. त्याचप्रमाणे, या निवेदनावर आजच्या आज निर्णय घेण्याचेही आदेश सांस्कृतिक विभागाला दिले.

तथापि, न्यायालयाच्या आदेशानंतर याचिककर्त्यांच्या निवेदनावर निर्णय घेतला गेला की नाही हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. संबंधितांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही याबाबत काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तत्पूर्वी, सार्वजनिक मैदानाचा वापर धार्मिक कारणासाठी केल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, या कारणास्तव परवानगी नाकारण्यात आल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला. तर स्थानिक मुस्लिम समुदाय करोना काळातील दोन वर्षे वगळता गेल्या ५० वर्षांपासून ईदनिमित्त सामूहिक नमाज पठणासाठी मैदानाचा वापर करत आहे. तथापि, कधीही कायदा आणि सुव्यवस्था किंवा वाहतूक समस्या निर्माण झाली नसल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद थोडक्यात ऐकल्यानंतर, मैदान एक संरक्षित स्मारक असल्यामुळे मैदानाच्या वापराची परवानगी राज्य सरकारच्या सांस्कृतिक आणि सामाजिक न्याय विभागाकडूनच दिली जाऊ शकते, असे न्यायालयाने नमूद केले. त्याचवेळी उच्च न्यायालयाने २००६ मध्ये अशा प्रकरणांमध्ये दिलेल्या आदेशाची आठवण खंडपीठाने राज्य सरकारला करून दिली आणि याचिकाकर्त्यांना या विभागाकडे निवेदन सादर करण्याचे आणि विभागाला आजच निर्णय घेण्याचे आदेश देऊन न्यायालयाने याचिका निकाली काढली.