कुलदीप घायवट, लोकसत्ता
मुंबई : राज्य सरकारने गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या-येणाऱ्यासाठी टोलमाफीची घोषणा केली असून २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबपर्यंत या कालावधीत टोलमाफी पास असणाऱ्यांना टोल भरावा लागणार नाही, असे राज्य सरकारच्या परिपत्रकात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. मात्र, या परिपत्रकात फास्टॅगविषयी स्पष्टता नाही. त्यामुळे याचा थेट फटका गणेशोत्सवानिमित्त कोकणात गेलेल्या मंडळींना बसला आहे. फास्टॅगधारक वाहनचालकांनी टोलमाफीचा पास दाखविल्यानंतरही परस्पर टोल कापल्याचे प्रकार घडत आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवकाळात कोकणात जाणाऱ्या आणि कोकणातून परतीचा प्रवास करणाऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. गणेशभक्तांसाठी ११ सप्टेंबपर्यंत टोलमाफी करण्यात आली आहे. या कालावधीत मुंबई – बंगळूरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इतर रस्त्यांवरील टोल नाक्यावर गणेशभक्तांकडून टोल आकारला जाणार नाही. टोलमाफी पास असणाऱ्या वाहनचालकांच्या वाहनांसाठी ‘गणेशोत्सव २०२२, कोकण दर्शन’ असे स्टिकर्स स्वरूपातील पास देण्यात आले आहेत. मात्र याबाबतच्या परिपत्रकात फास्टॅगबाबत विशेष सूचना करण्यात आलेल्या नाहीत. परिणामी, टोलमाफीचा पास असूनही फास्टॅगद्वारे सरळ बँक खात्यातून टोलचे पैसे वळते झाल्याचे प्रकार घडत आहेत.
वाहतूक कोंडीचाही त्रास
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांची आणि येणाऱ्यांची प्रचंड रहदारी असते. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. खड्डय़ांमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास होतो. त्यातच टोल नाक्यांवर मोठी वाहतूक कोंडी होत आहे.
फास्टॅग की डोकेदुखी?
वाहन घरीच असताना फास्टॅगमुळे टोल वसूल होणे, बँक खात्यांत रक्कम शिल्लक असतानाही टोलची रक्कम वजा न होणे, तर कधी खाते कार्यरत नसल्याचे सांगत टोलची रक्कम अधिक दंड वसूल करण्याचे प्रकार वारंवार टोल नाक्यांवर घडत आहेत. यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आता टोलमाफीचा पास असतानाही फास्टॅगमुळे तो बँक खात्यातून वळता झाल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. राज्य सरकारची टोलमाफीची घोषणा झाल्यानंतर कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनी तत्काळ टोलमाफीचे पास काढण्यास सुरुवात केली. फास्टॅग नसलेल्या वाहनधारकांना याचा कोणताही त्रास झाला नाही. मात्र, फास्टॅग असलेल्या वाहनधारकांची मोठी डोकेदुखी झाली आहे.