डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने शुक्रवारी नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील क्रीडासंकुलात आरोग्यविषयी जनजागृती महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, शिबिरानिमित्ताने नवी मुंबईत अचानक वाहनांची संख्या वाढल्यामुळे दुपापर्यंत शीव-पनवेल महामार्गावर तब्बल सहा तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. या शिबिरासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि पुणे येथून सुमारे दीड लाख रुग्ण आले होते. त्यामुळे महाशिबिराच्या जागतिक विक्रमाची गिनीज बुकात नोंद झाल्याचा दावा प्रतिष्ठानने केला आहे. या महाशिबिरात दीड लाख रुग्णांच्या आरोग्य तपासणीसाठी दीड हजार डॉक्टर आणि पाच हजार स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते. या शिबिरासाठी नवी मुंबईत दीड हजारपेक्षा जास्त बस गाडय़ा आणि एक हजार खासगी वाहने आल्यामुळे वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झाली.शीव-पनवेल महामार्गावर कोंडी झाल्याने तिचे परिणाम ठाणे-बेलापूर महामार्ग आणि पामबीच व जेएनपीटी मार्गावर जाणवले. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात वाहने येणार असल्याबाबत वाहतूक विभागास पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. तसेच वाहनांचा अंदाज वाहतूक शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नव्हता. त्यामुळे शहरात वाहतूक पोलिसांची कमी पथके तैनात करण्यात आली होती. मात्र, वाहतूक कोंडीचे स्वरूप लक्षात घेता वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलिसांची पथके वाढविण्यात आली. अचानक झालेल्या या कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वाहतूक विभागाचे उपायुक्त विजय पाटील यांनी सीबीडी उरण फाटय़ाजवळील कोंडी सांभाळली.