कुलदीप घायवट
मुंबई : बांधकामाधीन इमारतींलगत वाळू, सिमेंट, खडीचा ट्रक, डंपर आणि फिरत्या मिक्सरमधून होणारी वाहतूक खुल्या पद्धतीने करण्यात येत आहे. बांधकाम साहित्यावर ताडपत्री झाकणे बंधनकारक आहे. तरीही या नियमला हरताळ फासला जात आहे. त्यामुळे हवा प्रदूषणात भर पडत आहे. उच्च न्यायालयाने आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी आरटीओने पथके तैनात करण्यात आली आहेत. तरीही त्यांच्यादेखत अशी वाहने शहरभर वाहतूक करीत आहेत.
मुंबई शहर आणि उपनगरे हवा प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहेत. हवा प्रदूषणाचा मोठा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झाला आहे. यात श्वसनाचे विकार समस्या वाढली आहे. हवा प्रदूषणाला बांधकामाधीन इमारतीलगतची नियमबाह्य वाहतूक कारण असल्याचे मध्यंतरी स्पष्ट झाले होते. यासाठी वायूवेग पथकाची ८ नोव्हेंबरला नियुक्ती करण्यात आली. यात पीयूसी तपासणी, बांधकाम वाहने ताडपत्रीने आच्छादित केली आहेत की नाही याची पाहणी करण्याची जबाबदारी या पथकांवर सोपविण्यात आली.
हेही वाचा >>>मुंबई : भाडे नाकारणाऱ्या ४८५ रिक्षा, टॅक्सी चालकांचा परवाना निलंबित
वाहनातील रेती, खडी, राडारोडा यावर मात्र ताडपत्रीने न झाकताच त्यांची वाहतूक केली जात असल्याचे चित्र शहरात आहे. आरटीओच्या सूचनांचे उल्लंघन असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. उच्च न्यायालयाने हवा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठी तातडीने उपाययोजना हाती घेण्याचे आदेश दिले होते.
कुर्ला पश्चिम येथील क्रांतीनगर परिसरात ताडपत्रीने न झाकलेल्या वाहनांमधून सर्रास बांधकाम साहित्याची ने-आण करण्यात येत आहे. यामुळे हवेत धुरक्यांचे प्रमाण वाढले आहे, असे मत स्थानिक रहिवासी संतोष उघडे यांनी व्यक्त केले. लोअर परळ येथे नव्याने सुरू झालेल्या डिलाईल रोड पुलावरून खडीची वाहतूक करणारी वाहने नियम न पाळता ये-जा करीत आहेत. मात्र या वाहनांमधील खडी ताडपत्रीने झाकण्यात येत नाहीत. त्यामुळे धूळ उडते, असे सचिन दाभोलकर यांनी सांगितले.
तीन वर्षांनंतरही बदल नाहीच
वाळू, मुरूम, रेतीची वाहतूक करणारी वाहने बंद आवरण असलेली असावी किंवा ताडपत्रीने आच्छादित असावी, असे मोटार वाहन कायदा १९८८ मधील नियम १९० (३) व याबाबत केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ मधील नियम १३८ ब मध्ये स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे. यासंदर्भातील परिपत्रक नोव्हेंबर २०२० रोजी तत्कालिन परिवहन आयुक्तांनी जारी केले. या परिपत्रकाला तीन वर्षे होऊन सुद्धा मुंबई महानगरात ताडपत्रीचे आच्छादन नसलेल्या वाहनांतून सर्रास बांधकाम साहित्याची वाहतूक करण्यात येत आहे.\ कल्याण-मुरबाड मार्गावर प्रदूषण
कल्याणमध्ये मोठय़ा प्रमाणावर बांधकामे सुरू असून कल्याण-मुरबाड रस्त्यावरून सकाळच्या सुमारास शेकडो वाहने बांधकाम साहित्य घेऊन जात असतात. त्यापैकी बहुसंख्य वाहने नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे एका नागरिकाने सांगितले.
आरटीओची पथके कार्यरत आहेत. आजवर ताडपत्रीने आच्छादित न केलेल्या ७०० वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. – विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त