मुंबई : अतिवृष्टीमुळे राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टय़ा दिल्या जात आता चक्क विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनालाही दोन दिवसांची सुट्टी जाहीर झाली आहे. सोमवार आणि मंगळवारी (३१ जुलै आणि १ ऑगस्ट) विधिमंडळाचे सत्र न घेण्याचा निर्णय गुरुवारच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा हे या सुट्टीचे खरे कारण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पुरवणी मागण्या आणि विनियोजन विधेयकाला मंजुरी हे पावसाळी अधिवेशनातील सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय मार्गी लागले आहेत. त्यामुळे अधिवेशन शुक्रवारीच गुंडाळावे या दृष्टीने खटपट सुरू होती. अतिवृष्टी, पूर यामुळे आमदार मतदारसंघांमध्ये परतले आहेत. याचा आमदारांच्या उपस्थितीवर परिणाम होत असल्याचे कारण पुढे केले गेले होते. मात्र, याबाबत सत्ताधाऱ्यांमध्येही मत्तांतर असल्याचे समजते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे पूर्णवेळ कामकाज व्हावे, या मताचे होते. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनीही अधिवेशन गुंडाळण्यास विरोध केला. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अनुक्रमे विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समिती बैठकांमध्ये नियोजित तारखेपर्यंत, म्हणजे ४ ऑगस्टपर्यंत अधिवेशन सुरू ठेवावे, असे ठरले. मात्र, सोमवार-मंगळवारी सुट्टी देऊन केवळ बुधवार ते शुक्रवार असे तीन दिवस कामकाज चालवावे, असा निर्णय झाला.
सोमवारची सुट्टी का?
आमदारांना मतदारसंघांत जाऊन पूरस्थिती हाताळता यावी, यासाठी सुट्टी दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शनिवार-रविवारी आधीच सुट्टी असताना आणखी दोन दिवस का, असा प्रश्न विचारला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी पुण्यात असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री आणि सत्ताधारी आमदार तेथे असतील. याचा विधिमंडळ कामकाजावर परिणाम होईल. केवळ मंगळवारी कामकाज बंद ठेवले, तर एका दिवसासाठी बहुतांश आमदार मुंबईत येण्याचे टाळतील. त्यामुळेच दोन्ही दिवस सुट्टी दिल्याची चर्चा आहे.
पावसाळी अधिवेशन शुक्रवारीच गुंडाळण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता. पण पाऊस, पाणी, अतिवृष्टी यासारखे महत्त्वाचे प्रश्न राज्यासमोर उभे आहेत. यावर चर्चा होणे आवश्यक आहे. विरोधकांच्या मागणीवरून अधिवेशन ४ ऑगस्टपर्यंत चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे भेटीनिमित्त दोन दिवस कामकाज होणार नाही.-बाळासाहेब थोरात, काँग्रेस पक्षनेते