विधीमंडळाचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. यावेळी शिवसेना आमदार आणि एकनाथ शिंदे गटाचे आमदार आमनेसामने आले आहेत. मात्र, त्याआधीच विधीमंडळातील शिवसेनेचे पक्ष कार्यालयाला टाळे लावण्यात आले आहे. यावर शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या आदेशाने कार्यालय बंद ठेवण्यात आल्याची सूचना लिहिण्यात आली आहे. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे. “विधीमंडळाचे कार्यालय आम्हीच बंद केले आहे. कारण परत मोठ्या ताकदीने सभागृहात यायचे आहे. शिवसेनेचाच व्हीप अधिकृत आणि महत्त्वाचा आहे. कार्यालयाची चावी आमच्याकडेच आहे. काही लोकांना दुसरीकडे बंद करुन ठेवले होते आमच्या कार्यालयाबद्दल काय विचारता, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. “कसाबलाही असं आणलं नसेल”; शिवसेनेचे बंडखोर आमदार विधान भवनात दाखल होताच आदित्य ठाकरेंचा टोला दरम्यान, मोठ्या पोलीस बंदोबस्तात बसमधून शिवसेना बंडखोर आमदार हे विधान भवनात दाखल झाले आहेत. यावेळी या आमदारांसोबत भाजपाचे आमदार देखील होते. याबाबत माध्यमांशी बोलताना शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना टोला लगावला आहे. “बसमधून इथे आणलेल्या आमदारांबद्दल मला वाईट वाटत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. कसाबच्या वेळीदेखील इतका बंदोबस्त लावण्यात आला नव्हता. कसाबलाही असं आणलं नसेल. कोणी पळणार आहे का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे. तसेच शिवसेनेचंच व्हीप अधिकृत आहे असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे.