मुंबई : एकीकडे मुंबईत दररोज निर्माण होणाऱ्या हजारो मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान महानगरपालिका पेलत आहे. तर मालाडमध्ये ‘शून्य कचरा मोहीम’ यशस्वी करण्यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांची धडपड सुरू आहे. गेल्या दोन – तीन महिन्यांपासून मालाडमधील निवडक गृहनिर्माण संस्थांनी महापालिकेच्या सहकार्याने तब्बल ३३ हजार किलो कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती केली आहे. या प्रकल्पातून प्रेरणा घेत अन्य ५० गृहनिर्माण संस्थांनी कचरा वर्गीकरणातून सेंद्रिय खतनिर्मिती करण्याचा संकल्प सोडला आहे.
मुंबईमध्ये दिवसेंदिवस कचऱ्याची समस्या जटिल बनत आहे. दररोज अनेक भागातील रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग दिसू लागले आहेत. सध्यस्थितीत मुंबईत दररोज ६५०० मेट्रिक टनाहून अधिक कचरा जमा होत असून कचराभूमीतील कचऱ्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शिवाय या कचऱ्याचे वर्गीकरणही होत नसल्याने त्यावर प्रक्रिया करताना महापालिकेला विविध अडचणींना सामोरे जावे लागते. कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनातर्फे विविध उपाययोजना व उपक्रम राबविले जात आहेत. दरम्यान, महापालिकेच्या पी उत्तर विभागाच्या अखत्यारितील मालाड परिसरातील नागरिकांच्या मदतीने शून्य कचरा प्रकल्प राबविण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिका, इंडियन पोल्यूशन कंट्रोल असोसिएशन आणि स्वर्णलता मदरसन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मालाड येथील निवडक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये दोन – तीन महिन्यांपासून ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचा प्रकल्प राबविला जात आहे.
आतापर्यंत तीन गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ३३ हजार ८४० कचऱ्यावर प्रक्रिया करून ६ हजार ८३० सेंद्रिय खतनिर्मिती करण्यात आली आहे. मालाड रुपाली संस्थेनेही दरदिवशी २२ किलो कचऱ्यावर प्रक्रिया करत प्रकल्पात सहभाग नोंदवला. या सोसायट्यांना इंडियन पोल्यूशन कंट्रोल असोसिएशनकडून कंपोस्टरचे मोफत वितरण करण्यात आले होते. महानगरपालिकेने दर दोन आठवड्यातून नागरिकांची बैठक घेऊन कचरा वर्गीकरण, खतनिर्मिती याविषयी त्यांना मार्गदर्शन केले. तसेच, संबंधित अन्य विषयांवर चर्चा केली. गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये तयार करण्यात आलेल्या सेंद्रिय खताचा त्याच सोसायटीच्या उद्यानात वापर केला जात आहे. हा प्रयोग यशस्वी होत असल्याचे दिसून येताच मालाडमधील अन्य ५० गृहनिर्माण सोसायट्यांनीही खतनिर्मितीचा निर्णय घेतला आहे. शून्य कचरा प्रकल्पात सहभागी होणाऱ्या या सोसायट्यांना पर्यावरणदिनी एरोबिन कंपोस्टरचे वाटप करण्यात आले.
मालाडमध्ये शून्य कचरा प्रकल्पाला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. येत्या काळात हा प्रकल्प सर्वच सोसायट्यांमध्ये राबविण्यासाठी अधिक प्रयत्न केले जातील. तसेच, या प्रकल्पामुळे पालिकेच्या पी उत्तर विभागाला लवकरच शून्य कचरा क्षेत्र अशी ओळख प्राप्त होईल, अशी आशा पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त कुंदन वळवी यांनी व्यक्त केली.
गृहनिर्माण संस्था – कचऱ्याचे प्रमाण – तयार केलेले खत
लोटस टॉवर – ८६४० किलो – १७२८ किलो
मानवस्थळ सहकारी संस्था – ११७६० किलो – २३५२ किलो
रिद्धी गार्डन – १३४४० किलो – २७५० किलो