आपल्याच समर्थकाच्या उमेदवारीसाठी दोन गटात रस्सीखेच

नागपूर : भाजपने विधान परिषदेसाठी नागपुरातून माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी महापौर प्रवीण दटके यांची नावे पाठवली असून यातून एकाला उमेदवारी दिली जाणार असल्याचे कळते.

महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी २१ मे रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी नागपूर भाजपमधील दोन गटांनी दोन नावे पाठवली असून दोन्ही गट आपल्याच समर्थकाला उमेदवारी मिळावी म्हणून जोर लावत आहेत. भाजपने विधानसभा निवडणुकीत काही वरिष्ठ नेत्यांना उमेदवारी नाकारली होती. यामध्ये तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश होता. बावनकुळे यांचे ऐनवेळी तिकीट कापल्याने तेली समाजातील मोठा गट भाजपवर नाराज झाला होता. या समाजाच्या संघटना विदर्भात सर्वदूर आहेत. त्यामुळे ही नाराजी संपूर्ण विदर्भात पसरली. त्याचा फटका भाजपला विधानसभेत बसला आणि त्यांच्या जागा कमी झाल्या. तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांना प्रचारादरम्यान मतदारांमधील नाराजी जाणवू लागली. त्यामुळे त्यांनी बावनकुळे यांना मंत्र्यांपेक्षा मोठे पद दिले जाईल, असे जाहीर सभेत सांगावे लागले. पण, तोपर्यंत फार उशीर झाला होता. विदर्भात तेली समाजाची नाराजी भाजपला भोवली. त्यानंतर नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार नुकतेच आले होते आणि बावनकुळे यांना त्यांच्या पक्षाने डावलल्याची भावना मतदारांत होती. त्याचा जबर फटका भाजपला जिल्हा परिषद आणि पंचायती समिती निवडणुकांमध्ये बसला.

भाजपला जिल्हा परिषदेत पराभव बघावा लागला. या पार्श्वभूमीवर आता बावनकुळे यांचे सन्मानाने पुनर्वसन केले जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, भाजपला गटबाजीची बाधा झाल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या एका गटाने बावनकुळे यांचे नाव दिले असताना दुसऱ्या गटाने दटके यांचे नाव समोर केले आहे. त्यामुळे पक्षांतर्गत संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत, असे मत भाजपच्याच एका वरिष्ठ नेत्याने व्यक्त केले.

प्रवीण दटके यांचे नाव यापूर्वी देखील विधान परिषदेसाठी चर्चेत आले होते. परंतु त्यावेळी भाजपने गिरीश व्यास यांना संधी दिली. दटके मध्य नागपुरातून विधानसभेसाठी इच्छुक होते. परंतु जातीय समीकरण आडवे आले. आता पक्षांर्तगत गटबाजीत कोणाचा बळी जाते, याकडे लक्ष लागले आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारखी ११ मे आहे.

पूर्वी ही निवडणूक २२ एप्रिल रोजी होणार होती. परंतु करोनामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. भाजप आमदारांचे संख्याबळ बघता पक्षाला नऊ पैकी तीन जागा सहज जिंकता येऊ शकतात, असे चित्र आहे.