शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश

नागपूर : करोना काळात शाळा बंद असूनही अतिरिक्त बाबींसाठीचे पालकांकडून शुल्क वसूल करणाऱ्या शाळांविरोधात कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. असा प्रकार कुठेही झाल्यास थेट फौजदारी दाखल करा, असे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले.

नागपूर विभागातील पालकांच्या तक्रारीची दखल घेत कडू यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक  घेतली.  गेल्या वर्षीपासून करोनामुळे शाळा बंद  आहेत.  असे असतानाही ज्या बाबींची सेवाच मिळालेली नाही, अशा अनेक बाबींचे शुल्क वसूल करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत.  मुळात शाळाच बंद असताना असे शुल्क आकारणे बेकायदेशीर आहे. उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयाने देखील नैसर्गिक आपत्ती काळात शाळांनी अतिरिक्त शिक्षण शुल्क आकारू नये, असे निर्देश दिले आहेत. परंतु नागपूर विभागातील काही शाळा याकडे दुर्लक्ष करीत शिक्षण शुल्क वसूल करत आहेत.नागपूर विभागातील ज्या शाळांनी पालकांकडून अतिरिक्त शिक्षण शुल्क वसूल केले, त्यांच्या विरोधात थेट फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश कडू  यांनी अधिकाऱ्यांना दिले.

राज्य शैक्षणिक संस्था शुल्क अधिनियम २०११ ची संपूर्ण राज्यात कठोर अंमलबजावणी करा. प्रत्येक नियमाचे शाळांनी पालन करावे. कुठेही अतिरिक्त शुल्क आकारल्याचे आढळता कामा नये. पालकांच्या तक्रारी लक्षात घेऊन शिक्षण विभागाने आवश्यक तपासणी, कारवाई वेळीच करावी, असे निर्देश  कडू यांनी यावेळी दिले.

या बैठकीला विभागीय शिक्षण उपसंचालक वैशाली जमादार, सहाय्यक संचालक सतीश मेंढे, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, विभागीय शुल्क नियमन समिती सदस्य चंद्रमणी बोरकर,बबिता शर्मा, अ‍ॅड. पवन सहारे, अक्षय गुळ, अमित होशिंग आदी पालक उपस्थित होते.