देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील अनेक घोटाळे पुराव्यानिशी बाहेर काढणार असल्याचा इशारा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. फडणवीस सरकारमध्ये बांधकाम कामगार मंडळात तसेच आयटीमध्येही घोटाळा झाला. हे सर्व घोटाळे पुराव्यानिशी बाहेर काढू, असे ते म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विदर्भ कार्यकारिणीच्या बैठकीसाठी ते शनिवारी नागपुरात आले होते.

सरकार कुठलेही असले तरी राज्यात गेल्या काही वर्षांत जो काही सिंचन घोटाळा झाला आहे. त्याची चौकशी झालीच पाहिजे, जनतेच्या पैशाचे काय झाले याचे सत्य समोर आले पाहिजे,असे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. राज्यातील महाविकास आघाडीने दिलेली कर्जमाफी फसवी असून या कर्जमाफीचा नुकसानग्रस्त शेतक ऱ्यांना फायदा मिळत नसल्याची टीका त्यांनी केली. सिंचनाच्या विषयावर सत्ताधारी किंवा विरोधी पक्षांनी राजकारण करू नये. कर्जमाफीची केलेली घोषणा फसवी असून तिचा फायदा मूळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना होणार नाही.