उमेदवारांची दमछाक होणार

प्रचारासाठी केवळ दोन आठवडे मिळणार असल्याने तीन लाखांवर मतदारसंख्या असलेल्या विधानसभा मतदारसंघात कुठे कुठे फिरायचे, असा प्रश्न उमेदवारांना पडणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कार्यकर्त्यांचे महत्त्व वाढणार आहे.

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया चार ऑक्टोबरपासून सुरू होणार असून २१ ऑक्टोबरला मतदान आहे. त्यापूर्वी दोन दिवसाआधी प्रचार थांबेल म्हणजे दोनच आठवडे प्रचारासाठी उरतात. त्यामुळे उमेदवारांची घोषणा अर्ज भरण्याची  प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी होणे आवश्यक आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (७ ऑक्टोबर) उमेदवारीचा घोळ सुरू राहिल्यास उमेदवारांना प्रचारासाठी वेळच उरणार नाही, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

सध्या एकाही राजकीय पक्षाने उमेदवार जाहीर केले नाहीत. ज्यांची नावे निश्चित आहेत त्यांना तयारीला लागा असे सांगण्यात आले. पण, ते उघडपणे प्रचार करू शकत नाही. दुसरीकडे आपल्यालाच उमेदवारी मिळेल, असा समज असणाऱ्या पक्षातील अनेकांनी जनसंपर्क वाढवला आहे. त्यामुळे अधिकृत यादी लवकर जाहीर होणे हिताचे, असे काँग्रेसच्या एका इच्छुकाने सांगितले. दरम्यान, एक विधानसभा मतदारसंघ सरासरी अडीच ते तीन लाख मतदारसंख्येचा आहे. मतदारसंघ पिंजून काढायचे ठरवले आणि दिवस रात्र एक केले तरी दोन आठवडय़ात उमेदवार सर्व वस्त्यांमध्ये फिरू शकत नाही. त्यामुळे प्रचार यात्रा काढून धावती भेट द्यावी लागणार आहे. या पाश्र्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रचार हाच ऐकमेव पर्याय आता उमेदवारांकडे उरला आहे. भाजप, बहुजन समाज पार्टी हे ‘कॅडर बेस’ पक्ष आहेत. त्यांचे प्रत्येक प्रभागात कार्यकर्त्यांचे नेटवर्क तयार आहे.

विधानसभानिहाय मतदार संख्या

१) दक्षिण-पश्चिम     ३,८३,३८७

२) दक्षिण          ३,८१,७४७

३) पूर्व नागपूर    ३,७०,८८२

४) मध्य नागपूर   ३,२३,९५७

४) पश्चिम नागपूर ३,६०,८१९

६) उत्तर नागपूर   ३,८३,६६३

‘‘पक्षाचे बोधचिन्ह सर्वाना माहिती आहे. कार्यकर्त्यांचे नेटवर्क प्रत्येक वॉर्डात आहे. त्यामुळे फक्त उमेदवाराची माहिती कार्यकर्त्यांना द्यायची असते. ते आम्ही वॉट्स अ‍ॅपद्वारे बुथपातळीवरील कार्यकर्त्यांना देतो. आमच्यासाठी उमेदवार महत्त्वाचा नसतो चिन्ह महत्त्वाचे असते. त्यामुळे प्रचारासाठी कमी वेळ मिळूनही आम्ही मतदारांपर्यंत पोहोचतो.’’

– उत्तम शेवडे, बसपा.