गेल्या निवडणुकांमधील जाहीरनाम्यातील २५ टक्के कामांचीही पूर्तता नाही

‘स्मार्ट शहर’, देशातील ‘सर्वोत्तम शहर’, अंबाझरी आणि शुक्रवारी तलावात ‘सी प्लेन’ या सारखी एक नव्हे तर शेकडो आश्वासनांची उधळण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला गेल्या निवडणुकांमध्ये जाहीरनाम्यातून दिलेली २५ टक्के आश्वासनेसुद्धा पूर्ण करता आली नाहीत. त्यामुळे सध्या या पक्षाकडून देण्यात येणाऱ्या आश्वासनांवर विश्वास ठेवायचा कसा? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

२००७ आणि त्यानंतर २०१२ अशा महापालिकेच्या सलग दोन निवडणुका जिंकणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यावर नजर टाकल्यास त्यातील केवळ काही मोजक्याच (२५ टक्के) कामांना सुरुवात झाली आहे. ७५ टक्क्य़ांहून अधिक आश्वासने कागदावरच असल्याचे दिसून येते. २०१२ मध्ये पक्षाचा जाहीरनामा १९ मुद्यांवर आधारित होता. यात  मेट्रो रेल्वे, शहर बस (स्टार बस)च्या फेऱ्या वाढवणे, डॉ. आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक, शहरात चोवीस तास पाणी पुरवठा, नोएडाच्या धर्तीवर इंटरनॅशनल एक्स्पो सेंटर, एकात्मिक सांडपाणी योजना, इंग्रजी माध्यमांच्या शाळा, नवीन डम्पिंग यार्ड आणि भांडेवाडी तसेच चिखली खुर्द येथील डम्पिंग यार्डचे आरक्षण रद्द करणे, धोबी घाट, ३०० कोटी रुपये खर्च करून १३५ किमी लांबीचे सिमेंट रस्ते, नाग आणि पिवळी नदीसह प्रमुख तलावांचे सौंदर्यीकरण, फिरते पॅथालॉजी क्लिनिक, ६० हजार प्लॉट्सचे नियमितीकरण आणि विकसित करणे, अत्याधुनिक भाजीपाला आणि मटन, फिश र्मार्केट, सुरेश भट सभागृह, सिकलसेल मुक्त शहर, हॉकर्स झोन, मल्टीप्लेक्स पार्किंग, तरुणांना स्वयंरोजगारासाठी शिबिरे आणि मॉल्ससह इतरही प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, शहर वाहतूक ग्रीन इंधन आणि सीएनजीचा वापर करणे, फूटपाथवरील अतिक्रमण हटवून लँडस्केपिंग तयार करणे आदीचा समावेश होता. मेट्रो रेल्वेचे काम प्रगतीपथावर आहे. सिमेंट रस्ते आणि सुरेश भट सभागृहाचे काम सुरू झाले आहे. नागपूर सुधार प्रन्यासने गुंठेवारी ले-आऊट नियमित करण्याचे काम सुरू केले आहे. संपूर्ण शहरात चोवीस तास पाणी पुरवठा उपलब्ध होऊ शकलेला नाही. भाजपने २००७ च्या जाहीरनाम्यातील पूर्ण होऊ न शकलेली आश्वासने २०१२ च्या जाहीरनाम्यातून वळगली होती. यामध्ये ५०० मेगावॅट क्षमतेचा वीज प्रकल्प उभारणे, कचरापेटीमुक्त शहर, आऊटर रिंग रोड पूर्ण करणे, मालमत्ता कराच्या माध्यमातून महसूल वाढवणे, पथदिवे वाढवणे, फिरता दवाखाना सुरू करणे, पर्यटन माहिती केंद्र, पाच लाख झाडे लावणे, प्रत्येक घरात संत्र्याचे रोपटे वितरित करणे आदी आश्वानांचा समावेश होता. ही आश्वासने दहा वर्षांनंतरही पूर्ण झालेली नाहीत. यामुळे २०१७ च्या जाहीरनाम्यातून २०१२ च्या जाहीरनाम्यातील अपूर्ण आश्वासने वगळली जातात काय, हे बघणे आत्सुक्याचे ठरेल.

कागदावरील जाहीरनामा

महापालिका इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू झालेल्या नाहीत.

इंटरनॅशनल एक्स्पो सेंटर सुरू झाले नाही.

एकात्मिक सांडपाणी योजना सुरू झाली नाही.

हॉकर्स झोनची निर्मिती नाही.

बहुस्तरीय वाहनतळ नाही.

डॉ. आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक नाही.

२४ बाय ७ पाणी पुरवठा संपूर्ण शहरात सुरू झाला नाही.

नाग आणि पिवळी नदीचे सौंदर्यीकरण नाही.

स्वयंसहायता गटाच्या महिलांसाठी मॉल्स उभारणी नाही.

कामांना सुरुवात

मेट्रो रेल्वेचे काम सुरू आहे.

१३५ किमी लांबीच्या सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत.

शहरबसच्या काही भागात फेऱ्या वाढल्या आहेत.

गुंठेवारी ले-आऊटचे नियमितिकरण सुरू आहे.

सुरेश भट सभागृहाचे काम सुरू आहे.

भाजपचा आज जाहीरनामा

जाहीरनामा तयार आहे, मात्र नितीन गडकरी यांची वेळ मिळत नसल्याने तो जाहीर होण्यास विलंब झाला होता. मात्र, आता गडकरी शहरात आहेत आणि शनिवारी दुपारी चार वाजता तो जाहीर केला जाणार आहे.

– आमदार सुधाकर कोहळे, अध्यक्ष शहर भाजप, नागपूर