समाजमाध्यमांवरील आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

समाज माध्यमांचा वापर सुयोग्य पद्धतीने केला तर  उपयोगी ठरतो. डब्ल्यूओआरआरसी संस्थेने या माध्यमातून पशुपक्ष्यांच्या मदतीसाठी आवाहन केले आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरात भटकंती करणाऱ्या प्राण्यांना तहान भागवण्यासाठी सतत संघर्ष करावा लागतो. रखरखत्या उन्हात पाणी मिळाले नाही तर माणसाचा जीव कासावीस होतो. तीच गोष्ट या प्राण्यांबाबतही लागू पडते. पाणी न मिळाल्यास जीव कासावीस होतो आणि उष्माघाताने मृत्यू देखील ओढवतो. पाण्यासाठी भटकंती करताना काही प्राण्यांना गटारातून वाहणाऱ्या घाणेरडय़ा पाण्यावर तहान भागवावी लागते. मानवी जीवनात पशुपक्ष्यांचेही तेवढेच महत्त्व आहे आणि याच भावनेतून प्रत्येकाने त्याच्या घराच्या आवारात पशुपक्ष्यांसाठी जलकुंड व जलपात्र लावायला हवेत. याच उद्देशाने डब्ल्यूओआरआरसी या संस्थेने जलकुंडाची संकल्पना मांडली. या कामाकरिता लोकांचे सहकार्य मिळावे म्हणून फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्सअ‍ॅप या समाजमाध्यमांवर जलकुंडाकरिता मदतीचे आवाहन केले. या कामासाठी सर्वात पहिले संजय टोपरे यांनी मदतीचा हात दिला आणि त्यांच्या सहकार्यामुळे १०० जलकुंड मिळाले. इंडियास फर्सट टीथ आर्चर अभिषेक ठावरे हे देखील या अभियानात सहभागी झाले आणि पाच जलकुंडाची मदत त्यांनी केली. रजनी मुनेश्वर यांनी दहा जलकुंड  तसेच औरंगाबाद येथून सचिन उबाळे या पोलिसांनी देखील जलकुंड अभियानाला मदत केली. या मिळालेल्या जलकुंडाला डब्ल्यूओआरआरसीचे कार्यकर्ते नीलेश रामटेके, रजत तिरपुडे, स्वप्निल बोधाने यांनी रंगरंगोटी करून त्यावर संस्थेचे व्यावसायिक कलावंत यांनी अजय तिरपुडे यांनी लिखाण केले. किंग कोब्रा संस्थेचे अध्यक्ष अरविंद रतुडी व डब्ल्यूओआरआरसी संस्थेचे अध्यक्ष मुकुंद जोशी यांनी वाठोडा परिसरात या जलकुंडांचे वितरण केले.

जलकुंड अभियानात स्टेप अप फाऊंडेशनचे कमलेश उमाळे तसेच अभिषेक ठावरे, सौरभ भोयर, सतीश जांगडे, विक्रम देवतळे, नीलेश रामटेके, रजत वासनिक, अभिषेक देवगिरीकर, आशीष राहेकवाड, वृषभ पवार, अनिकेत खेरकर, डॉ. प्रज्ज्वल वंजारी, पशुवैद्यकीय डॉ. मयूर काटे, अंकित खळोदे, पीयूष आकरे, रोशन राऊत, उत्तमसिंग ठाकूर यांचा सक्रिय सहभाग होता.

महापालिकेने पुढाकार घ्यावा

शहरात आढळणारे सर्व मोकाट प्राण्यांची जबाबदारी नागपूर महापालिकेअंतर्गत येते. त्यामुळे महापालिकेनेसुद्धा दरवर्षी प्राणी व पक्ष्यांकरिता जलकुंड अभियान राबवायला हवे. शहरात सुमारे १६५ हून अधिक नगरसेवक आहेत, त्यांनी देखील त्यांना मिळणाऱ्या निधीतून दरवर्षी जलकुंड अभियान राबवावे, अशी विनंती संस्थेचे स्वप्निल बोधाने यांनी केली.