बालक वाहून गेल्यानंतरही महापालिका झोपेतच

नागपूर : शहरातील अनेक भागात नाल्यांना लागून सुरक्षा भिंत नसल्यामुळे तसेच अनेक नाल्याच्या भिंती जीर्ण झाल्यामुळे नाल्याकाठी राहणाऱ्या लोकांचे जीव धोक्यात आले आहेत.

गेल्यावर्षी उत्तर नागपुरात एक बालक वाहून गेल्यानंतर महापालिकेकडे अनेक तक्रारी आल्या. मात्र गेल्या वर्षभरात त्यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे शहरात जर मुंबईसारखी स्थिती निर्माण झाल्यास नाल्याकाठावरील परिसरातील लोकांच्या जीवांचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शहरातील नाग, पिवळी व पोहरा नदीला अनेक ठिकाणी सुरक्षा भिंत नाही तर काही ठिकाणच्या भिंती जीर्ण झाल्या आहेत. यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात दरवर्षी निधीची तरतूद केली जाते किंवा संबंधित परिसराच्या नगरसेवकांच्या वार्ड निधीतून कामे केली जातात. मात्र या भिंतींची दुरुस्ती अथवा नव्या भिंतीही बांधल्या जात नाहीत. काही दिवसापूर्वी यशवंत स्टेडियम परिसरात संगम चाळीला लागून असलेल्या नाल्याजवळील िभत पडली. तेथून काही फुटावर घरे आहेत. मात्र अजूनही तेथे सुरक्षा भिंत बांधण्यात आली नाही. दोन आठवडय़ापूर्वी शहरात मुसळधार पाऊस झाला त्यावेळी अनेक ठिकाणी, नदी नाल्यांच्या काठावर संरक्षण भिंत नसल्यामुळे झोपडपट्टी आणि वस्त्यांमध्ये नाल्याचे पाणी शिरल्याचे प्रकार समोर आले. पावसाळ्यात नाल्यातील घाण पाणी लोकांच्या घरात येत आहे.

महापालिका व संबंधित विभागाकडून एकीकडे शहरात कोटय़वधी रुपये खर्च करत सिमेंट रस्ते तयार केले जात आहेत. दुसरीकडे नाल्याच्या काठी असलेल्या सुरक्षा भिंतीकडे मात्र महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.  रमाईनगर, जागृत नगर, डोबीनगर. बोरनाला, शीलानगर, दहीबाजार या ठिकाणी नाल्याच्या ठिकाणी भिंत नाही. महापालिकेच्या विविध झोनअंतर्गत नाल्याला लागून असलेल्या ८० ठिकाणी अद्याप संरक्षण भिंत उभारण्यात आली नाही. उत्तर नागपुरातील पिवळी नदी भागात कृष्णानगर, शीलानगर, रमाई नगर या भागातील नाल्यावर भिंत खचली असून ती गेल्या दोन वर्षांपासून पडक्या अवस्थेत आहे.

अशोक चौक ते रेशीमबाग चौक परिसरात सुरक्षा भिंत बांधण्याचा प्रस्ताव असताना अजूनही ती बांधण्यात आली नाही. विशेष म्हणजे या परिसरात अनेक लहान मुले खेळत असतात. भांडेवाडी परिसरात डंपिंग यार्ड असून त्याला लागून असलेल्या नाल्यालाही भिंत नाही. त्यामुळे परिसरातील  नाल्याच्या काठी  साठवलेला कचरा पावसामुळे नाल्यात वाहत जातो मात्र त्याकडे महापालिकेचे लक्ष नाही. शहरात मुंबईसारखी स्थिती निर्माण झाल्यास नाल्यांच्या काठावर वसलेल्या नगरातील लोकांच्या जीविताला मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सुरक्षा भिंत नसलेले परिसर

यशवंत स्टेडियम, नंदनवन झोपडपट्टी, शांतीनगर, सिरसपेठ, रविनगर वसाहत, गवळीपुरा, बजरंगनगर, शेषनगर, पँथरनगर  झोपडपट्टी, इंदिरा गांधी नगर झोपडपट्टी, कस्तुरबा सोसायटी, नयापूर, बालाजीनगर, दहीबाजार, बोरनाला, कृष्णानगर, शीलानगर, कुशीनगर, गुलशननगर, पिवळी नदी ओव्हर ब्रिज, चांभार नाल्याजवळील परदेशी मोहल्ला, डोबीनगर, खदान, इंदिरा माता नगर, न्यू मंगळवारी, शांतीनगर, राहुलनगर, मुळीक कॉम्प्लेक्स, कर्वेनगर, समर्थनगरी, नंदनवन, राहतेकर वाडी, पारडी, कुंदनलाल गुप्तानगर, जोगीनगर, काशीनगर, बालाजीनगर, भीमनगर, आदिवासीनगर, जंबुदीपनगर आदी परिसर नाल्यांच्या जवळ आहेत.