संजय मोहिते

बुलढाणा पोलीस विभागाकडून इयत्ता बारावीच्या गणित विषयाच्या पेपरफुटीचा तपास सुरू आहे. तपासामुळे शिक्षण व पोलीस विभागाला घाम फुटला आहे. मात्र, मंडळाने मात्र पेपर ‘खऱ्या अर्थाने फुटला नसल्याचा’ निर्वाळा देत पेपर नव्याने घेण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. बारावी परीक्षेच्या या अजब गणिताने लाखो विद्यार्थी व पालक मात्र चक्रावून गेल्याचे चित्र बुलढाण्यासह राज्यात निर्माण झाले आहे.

हेही वाचा >>>अकोला: साक्ष देणे टाळले अन् डॉक्टरला थेट कारागृहात जावे लागले

मंडळाने तडकाफडकी एक वेगळीच ‘क्लीन चिट’ देऊन पुनपरीक्षा नाहीच, असा ठाम पवित्रा घेतला. यामुळे गणिताचा पेपर पुन्हा होईलच, अशी खात्री असलेला प्रामाणिक वर्ग थक्क झाला आहे. शुक्रवारी सिंदखेड राजा तालुक्यातील परीक्षा केंद्रावरून गणिताची प्रश्न पत्रिका फुटली. परीक्षार्थी केंद्रात विराजमान होत नाही तोच सकाळी साडेदहा वाजता प्रश्नपत्रिकेतील दोन पाने समाज माध्यमांवर झळकली. समाजमाध्यमावरील हे ‘गणित’ थेट विधानसभेत झळकले. अमरावती मंडळाचे सहसचिव तेजराव काळे बुलढाण्यात दाखल झाले. यामुळे प्रचंड दवाबत आलेल्या शिक्षण विभागाला पोलिसांनी संध्याकाळपर्यंत छळले. साखर खेर्डा व सिंदखेडराजा पोलिसांनी हद्दीवरून जगन मुंडे व रंगनाथ गावडे या अधिकाऱ्यांना टोलवत आणि झुलवत ठेवले. अखेर रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा >>>नागपूर: देशातील ११ राज्यांतील २५० विद्यार्थ्यांची नागपूर मेट्रोतून सफर

या पार्श्वभूमीवर कुठे पोलीस विभागाने तपास सुरू केला. घटनास्थळ भेटी, संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी, जाबजवाब घेणे सुरू केले आहे. तूर्तास ‘तपास सुरू आहे’, असे सांगण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

म्हणे, पेपर बाहेर, विद्यार्थी आत
या पार्श्वभूमीवर पुणे स्थित राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी, आज गणिताचा पेपर नव्याने घेण्याची शक्यता फेटाळून लावली. प्रश्नपत्रिकेची दोन पाने ३ मार्चला सकाळी १०.३० ला प्रसारित झाली, तेंव्हा परिक्षार्थी केंद्रात होते. सार्वत्रिक झालेली ही पाने कोणत्याही विध्यार्थ्यापर्यंत पोहोचली नसल्याचे आढळून आले आहे, असा खुलासा श्रीमती ओक यांनी केला आहे. यामुळे हा पेपर पुन्हा घेण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच गुन्हा दाखल करून तपास सुरू असल्याचा उल्लेख मंडळाने केला आहे. माहिती विभागाच्यावतीने आज येथेही हा खुलासा प्रसिद्धीस देण्यात आला आहे.