यवतमाळ: वारकऱ्यांच्या सर्वात मोठ्या सोहळ्यासाठी यवतमाळ आगार सज्ज झाले आहे. पंढरपूर वारीसाठी जिल्ह्यातील नऊ आगारातून २५० बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. ३० जूनपासून या बसेस नऊ आगारातून सुटणार आहेत.

आषाढी एकादशी वारीचा सोहळा २ जुलैपासून सुरु होत आहे. विठ्ठल नामाचा गजर करत महाराष्ट्रभरातून वारकरी पंढरपूरला जातात. पंढरपूर येथे वारकऱ्यांना पोहोचविण्यासाठी जिल्ह्यातील नऊ आगारातून २५० एसटी बसेस सोडल्या जाणार आहे. याशिवाय ४० ते ५० एसटी बसेस थेट गावोगावातील वारकऱ्यांसाठी सोडण्यात येणार आहे. यामध्ये यवतमाळ आगारातून ४०, पुसद ३४, वणी २७, उमरखेड ३१, दारव्हा २९, पांढरकवडा २८, नेर १८, दिग्रस २४ तसेच राळेगाव आगारातून १९ अशा एकूण २५० एसटी बसेस सोडल्या जाणार आहेत. आषाढी यात्रेसाठी गाव तसेच तालुकापातळीवर प्रसिद्धी केली जात आहे. प्रवासामध्ये ज्येष्ठ महिला व पुरुषांना प्रवास तिकिटीत ५० टक्के सवलत, तर वयाची पंचाहत्तरी पूर्ण करणाऱ्या वयोवृद्धांना मोफत प्रवास करता येणार आहे. आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी जिल्ह्याभरातील वारकऱ्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

आषाढी यात्रेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ जिल्हा आगाराने यात्रा वाहतुकीचे नियोजन केले आहे. यामध्ये इंधन भरण्याची ठिकाणे निश्चित करण्यासोबतच प्रवासाचे टप्पे आणि त्यातील तिकीट दर निश्चित केले आहे. यामध्ये यवतमाळ ते पंढरपूर ८५५, वणी ते पंढरपूर १०२५, यवतमाळ ते पुसद मार्गे पंढरपूर ९१५, पुसद ते पंढरपूर ७४४ आणि नेर ते पंढरपूर ८९४ रुपये असे तिकिटीचे दर राहणार आहे. आषाढी यात्रा वाहतुकीचा कालावधी २ ते १३ जुलैपर्यंत असणार आहे. बुधवार २ जुलै म्हणजेच सप्तमीपासून यात्रेची सुरूवात होणार आहे. ३ जुलै अष्टमी तर नवमीला म्हणजेच ४ जुलै रोजी रिंगण सोहळा भरणार आहे. ५ जुलै रोजी दशमी तर ६ जुलै हा आषाढी एकादशीचा मुख्य दिवस आहे. १० जुलै रोजी आषाढ पौर्णिमा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला महत्व

जिल्हाभरातून यात्रेत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची सुरक्षितता जपली जाईल. आगारातून किंवा निर्धारित आगारातून यात्रेसाठी येऊ न शकलेल्या वारकऱ्यांसाठी आम्ही जवळपास ५० ज्यादा बसेसचे नियोजन केले आहे. एखाद्या गावात वारकऱ्यांची तितकी संख्या मिळाली की थेट या वाहनातून त्यांना पंढरपूर पोहचविले जाणार आहे. याशिवाय कमी उत्पन्नाच्या फेऱ्या या दरम्यान बंद ठेवल्या जाणार असल्याची माहिती यवतमाळ विभाग नियंत्रक अमृतराव कच्छवे यांनी दिली.