चंद्रपूर : महाराष्ट्र-तेलंगणा सीमावर्ती भागात दीड महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या आणि सतत वन विभागाला हुलकावणी देणाऱ्या चपळ बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. दीड महिन्यांपूर्वी राजुरा तालुक्यातील लक्कडकोट येथील एका शेतकऱ्यावर हल्ला करून ठार करणाऱ्या बिबट्याला अखेर बुधवार १८ जानेवारी रोजी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान जेरबंद करण्यात वनविभागास यश आले. मध्य चांदा वन विभागाच्या विरूर वनपरिक्षेत्र अंतर्गत लक्कडकोट वनक्षेत्रात दीड महिन्यांपूर्वी बिबट्याचा धुमाकूळ सुरू होता. सुब्बईजवळील तुम्मागुडा येथील व लक्कडकोट येथील एक अशा दोन शेतकऱ्यांवर हल्ला करून त्यांना ठार केले होते. शिवाय काही बकऱ्या फस्त केल्या होत्या. त्यामुळे, वनकर्मचाऱ्यांनी त्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी रात्रंदिवस मोहीम सुरू केली होती. अखेर लक्कडकोट नियतक्षेत्राचे कक्ष क्रमांक ४८ मध्ये ठेवलेल्या पिंजऱ्यात बिबट जेरबंद झाला, याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी देवराव पवार यांनी वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना दिली व मार्गदर्शक सूचनेनुसार कार्यवाही आणि वैद्यकीय तपासणी करून त्यास चंद्रपूरला हलवण्यात आले. हेही वाचा - यवतमाळ : देशी दारू दुकान हटवण्याची तक्रार मागे घेण्याचा मोह नगरसेवकाच्या अंगलट हेही वाचा - नागपूर : दैनदिन प्रवसी संख्या एक लाखावर जाताच मेट्रोने घेतला ‘हा’ निर्णय ही मोहीम उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, सहाय वनसंरक्षक श्रीकांत पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी देवराव पवार, क्षेत्र सहायक मनोहर गोरे, शेख, सुरेश मांदाडे, रवी वैद्य, सुमेध शिंदे, प्रिया लांडगे, नरेश लाडसे, तसेच 'पीआरटी'चे पथक, कोष्टळा कॅम्पमधील वनमजूर, देवाडा, सिद्धेश्वर येथील वनपाल वनरक्षक यांनी यशस्वीपणे राबवली. बिबट जेरबंद झाल्याने वनकर्मचाऱ्यांसोबतच जनतेनेही सुटकेचा नि:श्वास सोडला.