वाशीम : तालुक्यातील कोंडाळा झामरे येथील विनोद बुंधे या शेतकऱ्याने पारंपरिक गहू, हरभरा पिकाला बगल देत भगर आणि राजगिऱ्यासारख्या दिसणाऱ्या क्विनोवा पिकाची लागवड करून नवीन प्रयोग केला. सध्या हे पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असून एकरी सात ते दहा क्विंटल उत्पादन होण्याची अपेक्षा आहे.

क्विनोवा हे तृणधान्य पीक आहे. याची लागवड १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरदरम्यान रब्बी हंगामात केली जाते. पेरणीसाठी किमान एक ते दोन किलो बियाणे लागते. चार ते पाच वेळा पाणी दिल्यानंतर जवळपास ९० दिवसात हे पीक काढण्यासाठी तयार होते. क्विनोवाची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते. त्यामुळे जास्त फवारण्या कराव्या लागत नाहीत. तसेच कमी पाण्यात आणि हलक्या जमिनीतही याचे उत्पादन घेणे शक्य आहे.

हेही वाचा >>>“मराठा-ओबीसी वादामुळे अशांतता ,५० हजारांहून अधिक उद्योग ” काय म्हणाले पटोले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्विनोवाचा वापर ज्वारीप्रमाणे चारा पीक म्हणूनही करता येतो. क्विनोवाची सुपर फूड म्हणून ओळख असल्याने परदेशात याला मोठी मागणी असते. आपल्याकडे उपमा, शिरा आणि अनेक पदार्थ क्विनोवा  पासून बनवले जातात.  ग्लुटीन फ्री असल्यामुळे भात आणि गव्हाला ते उत्तम पर्याय ठरू शकते. क्विनोवा मध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते त्यामुळे बाजारातही याला चांगली मागणी आहे. मध्य प्रदेशातील नीमज मध्ये याची विक्री केली जाते. महाराष्ट्रात अहमदनगर आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याआधी या पिकांचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. आता या पिकाची लागवड विदर्भात मातीत होत असून शेतकऱ्यांना परवडणारे पीक ठरण्याची शक्यता आहे.